✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.16मार्च):-स्थानिक पंचशील महिला मंडळ व वऱ्हाड विकास प्रकाशन संस्थेच्या वतीने किशोरनगर येथे जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले स्मृतिदिन समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड अध्यक्षतेत संपन्न झाला.ज्येष्ठ कवी-लेखक प्रा.अरुण बुंदेले हे प्रमुख वक्ते तर प्रमुख अतिथी पुंडलिक गोसावी होते.
अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
पंचशील महिला मंडळाच्या सौ.वर्षा भालचक्र यांनी दि.१० मार्चला संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची भूमिका मांडली.
सावित्रीबाई फुले यांचे संघर्षमय जीवन प्रेरणादायी – प्रा.श्रीकृष्ण बनसोड
अध्यक्षीय भाषणात समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की,” क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना देहावसान झाले. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर वंचित समाज घटकांना न्यायोचित हक्क मिळण्यासाठी सर्वकष लढा दिला आणि रुग्णांना जीवदान दिले.त्यांचे संघर्षमय जीवन सकल मानवजातीला प्रेरणा देणारे आहे.” असे विचार व्यक्त केले.
सावित्रीबाईमुळे स्त्रिया विविध क्षेत्रात प्रगतीपथावर – प्रा.अरुण बुंदेले
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी,” भारतातील आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले या महिलांच्या हक्कांसाठी लढल्या.अस्पृश्य व स्त्रियांना शिक्षित करून त्यांच्या जीवनातील तिमिर नष्ट केला. बालहत्याप्रतिबंधक गृह स्थापन करून अनौरस बालकांचे प्राण वाचवून शेकडो बाळांच्या आई झाल्या.न्हाव्यांचा संप घडवून केशवपण बंदी करून विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले. महिला सेवा मंडळाची स्थापना करून महिलांच्या उन्नतीसाठी कार्य केले.बालविवाहाविरुद्ध मोहिम उभारली व सतीप्रथेला कडाडून विरोध केला. सावित्रीबाईंचे सामाजिक शैक्षणिक कार्य आजही प्रेरक आहे.सावित्रीबाई फुले मुळे आज स्त्रिया विविध क्षेत्रात प्रगतीपथावर पोहोचलेल्या आहेत.” असे विचार व्यक्त केले.
श्री.पुंडलिक गोसावी, सौ.कुमुद गडलिंग (शिक्षिका) यांनी विचार व्यक्त केले. उद्योजिका सौ.स्मिता रवि राजूरकर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
सौ.कला प्रमोद शारदा यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्यावर कविता सादर केली.
दिव्या इंगळे ने आभार मानले
याप्रसंगी सौ.नंदा बनसोड, सौ.मालती इंगळे (पाटील),सौ. मीना गावंडे,भारती भालचक्र, खुशी इंगळे,श्वेता खेडकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.



