‘ शुभ’मन पर्वास सुरुवात

61

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. २० जून पासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारताचे आधारस्तंभ असलेले अनुभवी रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. भारताचे आधारस्तंभ असलेल्या या त्रिमूर्तीने जवळपास दीड दशके भारतीय क्रिकेटची धुरा वाहिली त्यामुळे या तिघांच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळतोय ते ही इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आणि ते ही त्यांच्याच देशात त्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघात कोणते खेळाडू असतील ? संघाचा कर्णधार कोण असेल? अश्विन, रोहित आणि विराट या तिघांची जगा कोण भरून काढणार ? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले होते. या प्रश्नाचे उत्तर निवड समितीने नुकतेच दिले. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. हे करताना त्यांनी नव्या कर्णधाराचीही घोषणा केली.

भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून युवा फलंदाज शुभमन गिलची निवड केली. युवा शुभमन गिल हाच भारताच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार असेल अशी अपेक्षा होती आणि ती खरी ठरली. मी माझ्या ‘ भारतीय कसोटी संघाचा संक्रमणकाळ’ या लेखात तसे भाकीत वर्तवले होते ते खरे ठरले. शुभमन गिलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकून निवड समितीने त्याच्यावर मोठा विश्वास टाकला आहे अर्थात या विश्वासाला तो पात्र ठरेल का ? याचे उत्तर आगामी काळात मिळेलच मात्र त्याच्यावर ही कामगिरी सोपवून निवड समितीने सकारात्मक पाऊल टाकले आहे हे मान्यच करावे लागेल. शुभमन गिल आता २५ वर्षाचा आहे. अवघ्या २५ व्या वर्षी कर्णधारपदाची माळ गाळ्यात पडलेला शुभमन गिल हा पहिला खेळाडू नाही या आधी पतौडी, सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री यांनी २५ व्या वर्षी किंवा त्याआधीच कर्णधारपद भूषवले आहे.

सचिनकडे तर अवघ्या २१ व्या वर्षीच ही जबाबदारी आली होती. शुभमन गिलने मागील सात वर्षात जी कामगिरी केली त्या आधारेच त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. मागील सात वर्षातील त्याची कामगिरी चांगलीच नाही तर अविश्वसनियन अशी आहे. या सात वर्षात त्याने फलंदाज म्हणून तर छाप पाडलीच आहे पण कर्णधार म्हणूनही त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. २०१८ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली १९ वर्षाखालील भारतीय संघाने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. या संघाचे नेतृत्व ज्याप्रकारे केले होते ते पाहून तेंव्हाच काही जाणकारांनी तो भविष्यात भारताच्या मुख्य संघाचा कर्णधार असेल असे भाकीत केले होते. ते भाकीत आज खरे ठरले.

केवळ १९ वर्षाखालील संघाचीच नव्हे तर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या संघाचे नेतृत्व केले ते पाहता तो भारतीय संघाचे नेतृत्व करण्यास पात्र असल्याचे सिद्ध झाले. सध्या चालू असलेल्या आयपीएलमध्ये त्याने त्याच्या कुशल नेतृत्वाने गुजरात संघाला प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवून दिला. या दरम्यान त्याने फलंदाजीतही चमक दाखवत ६०० च्या वर धावा काढल्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता २० जूनला तो पहिल्यांदा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल त्या क्षणापासून भारतीय क्रिकेटमध्ये! ‘ शुभ’ मन पर्व सुरू होईल. शुभमन गिलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असली तरी त्याच्यासाठी हे पद सांभाळणे सोपे नाही. भारतीय संघाचा कर्णधारपदाचा मुकुट हा काटेरी असतो.

तो मुकुट धारण करणे म्हणजे साक्षात निखाऱ्यावरून चालण्यासारखे आहे त्यात शुभमन गिलला जो संघ दिला आहे तो नवखा आहे. या संघात अनेक नव्या खेळाडूंचा समावेश आहे. यातील बहुतेक खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. बुमरा, पंत आणि के एल राहुल याच खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे त्यामुळे या नव्या खेळाडूंना घेऊन इंग्लंड सारख्या खडतर दौऱ्यावर जाऊन तिथे जिंकणे हे मोठ्या जिकिरीचे काम शुभमनला करावे लागणार आहे. अर्थात या संघाकडे गमावण्यासारखे काही नाही मात्र कमावण्यासाठी खूप काही आहे. शुभमन गिलने जर या नवख्या खेळाडूंकडून त्यांच्यातील सर्वोत्तम खेळ करून घेतला आणि आपल्या कुशल नेतृत्वाने भारतीय संघाला विजय मिळवून दिला तर मोठा इतिहास घडेल. अर्थात इतिहास घडवण्याची क्षमता या संघात आणि नव्या कर्णधारात आहे यात शंका नाही. भारतीय संघास आणि भारतीय संघाचा नवा कर्णधार असलेल्या शुभमन गिल यांस खूप खूप शुभेच्छा! 

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५