प्रस्तावना:-
मराठी साहित्य हे सदैव समाजाचे प्रतिबिंब राहिले आहे. ग्रामीण जीवन, श्रमिक जगणं, उपेक्षित घटकांची वेदना, दलित चळवळ, शोषितांचे प्रश्न आणि आदिवासी-बहुजन अनुभव यावर आधारित कादंबऱ्या मराठीत विशेष स्थान राखतात. याच परंपरेत ‘बेडा’ ही कादंबरी वेगळी उठून दिसते. ही कादंबरी केवळ कलात्मकतेच्या निकषांवर समृद्ध नाही, तर ती एक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक दस्तऐवज आहे.
अशोक पवार यांची ‘बेडा’ ही कादंबरी बहुरूपी या सतत भटकंतीचे जीवन जगणाऱ्या समाजाच्या आयुष्यातील विविध पैलू, संघर्ष, मूल्यसंघर्ष, शिक्षण, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार, दारिद्र्य, दुःख गरिबी, भूक, उपासमार, राजकारण, आणि राजकीय शोषण यांचा परखड वेध घेते. ‘बेडा’ म्हणजे जणू सामाजिक बेड्या, जातीय बेड्या, सांस्कृतिक बेड्या, आणि मानसिक बेड्या… ज्या एका समाजाला बांधून ठेवतात. ही कादंबरी आपल्याला त्या जगात घेऊन जाते, जिथे जीवन म्हणजे संघर्ष आणि अस्तित्व म्हणजे प्रश्नचिन्ह.
I. कथानकाचे विस्तृत विश्लेषण
‘बेडा’ कादंबरीचे कथानक एका उत्तम या युवकाच्या आत्मशोधाभोवती फिरते. उत्तम हे या कथानकाचे मुख्य पात्र आहे. त्याच्या माध्यमातून लेखकाने संपूर्ण बहुरूपी समाजाचे, विशेषतः त्याच्या उतरत्या सामाजिक स्थितीचे आणि मूल्यांची होणारी गळचेपी याचे अत्यंत प्रगल्भ व सत्य घटनांवर आधारित दर्शन घडवले आहे.
कथानकाचा आरंभ उत्तमच्या बालपणापासून होतो. तो एका गरीब, पारंपरिक बहुरूपी कुटुंबात जन्मतो. त्याचे वडील बहुरूपी खेळ सादर करून उदरनिर्वाह करतात. हे खेळ म्हणजे चमत्कारिक वेशभूषा, देवदूत, राक्षस, साधू, देवी-देवतांचे रूप घेऊन लोकांची करमणूक करणे आणि देवाच्या नावाने जोगवा मागणे. उत्तम बालवयातच याची साक्ष देतो, पण त्याच्या मनात ही कला टिकवावी की शिक्षण घेऊन स्वतःचं आयुष्य घडवावं याचा द्वंद्व सुरू असतो. अशातच त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या अडथळ्यांची शृंखला सुरू होते. घरची गरिबी, वडिलांचे व्यसन, आईची वेदना, समाजाकडून मिळणारी तुच्छता, आणि शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी. शालेय जीवनात उत्तमला आलेले अनुभव निखळ व सुखद नाहीत. शिक्षकांच्या अपमानास्पद वागणुकीपासून ते जातीय वादांपर्यंत, अनेक प्रसंग त्याच्या मनावर खोल परिणाम करतात. तरीही तो शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत राहतो. डी एड पर्यंतचे शिक्षण पूर्ण करतो. या शिक्षणाच्या जोरावर तो शिक्षकाच्या नोकरीला लागण्याचा प्रयत्न करतो. पण समाजातील राजकारण आणि भ्रष्टाचारामुळे त्याला शिक्षकाची नोकरी लागत नाही. त्यामुळे तो अस्वस्थ होतो. उत्तमच्या आयुष्यात प्रेमही येते, पण त्या प्रेमातही जात-पात, सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठेचे राजकारण आडवे येते. या गोष्टी त्याला अधिक अंतर्मुख करतात. एकीकडे त्याच्या अंगात कलागुण असूनही समाज त्याला कलावंत म्हणून मान्यता देत नाही. त्याच्या समाजाला उपहासाने ‘नटसमाज’, ‘बेडे’, ‘जोकर’ वगैरे टोपणनावं लावली जातात. ही सामाजिक ओळख त्याच्या प्रगतीच्या मार्गात आड येते. शेवटी उत्तम व्यसनाच्या विळख्यात सापडतो. व्यसनातून तो स्वतःची सुटका करू पाहतो, पण पुन्हा पुन्हा तोच अंध:कार त्याला गिळतो. अखेरीस, तो काही माध्यमातून लेखन, विचारमंथन, संघर्ष यातून तो एक वेगळा मार्ग निवडतो आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाचे भान येते.
अशोक पवार लिखित ‘बेडा’ ही कादंबरी केवळ एका बहुरूपी या भटव्या विमुक्त समाजाच्या कथा-कहाण्यापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण ग्रामीण समाजाच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर झगझगीत प्रकाश टाकणारी साहित्यकृती आहे. या कादंबरीमध्ये राजकारण भ्रष्टाचारआणि अंधश्रद्धा या तीन मुख्य घटकांच्या आधारे समाजाचे शोषण कसे केले जाते, याचे उत्तम चित्रण केले आहे.
II. व्यक्तीरेखा
1. उत्तम ही:-
उत्तम ही या कादंबरीतील सर्वात जिवंत व प्रभावी व्यक्तीरेखा आहे. तसेच तो या कादंबरीचा मुख्य नायक आहे. त्याचा संपूर्ण प्रवास म्हणजे एक ‘माणूस’ होण्याचा प्रवास आहे. समाजाने जिचा वारसा ‘जोकर’ म्हणून दिला, तो वारसा झुगारून स्वतःचे मूल्य शोधणाऱ्या आणि त्यासाठी झगडणाऱ्या युवकाचे प्रतीक म्हणजे उत्तम. तो तसा शारीरिकदृष्ट्या सामान्य, पण मानसिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. त्याचं आत्मभान प्रगल्भ आहे. तो समाजावर प्रश्न विचारतो, स्वतःवरही प्रश्न विचारतो. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया, मित्र, शिक्षक हे सगळे त्याला स्वतःचं अस्तित्व शोधण्याच्या प्रवासात कुणी सहायक तर कुणी अडथळा ठरतात.
2. उत्तमचे वडील:-
उत्तमचे वडील राम हे एकेकाळी नामवंत बहुरूपी कलावंत होते. त्यांच्यात कलाप्रेम आहे, ते उत्कृष्टपणे किंगरी नावाच्या वाद्य वाजवत होते पण त्याचबरोबर व्यसन, अहंकार, आणि काळाशी जुळवून न घेण्याची वृत्ती देखील त्यांच्या होती. त्यांचं पात्र परंपरेचे प्रतिनिधित्व करतं. जे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होतोय पण जे कालबाह्य होत चालले आहे.
3. उत्तमची आई:-
उत्तमची आई म्हणजे त्याच्या घराचा आधारस्तंभ आहे. तिचे पात्र बहुसंख्य उपेक्षित स्त्रियांचे प्रतीक आहे. शोषण सहन करणारी, मुलांच्या भवितव्यासाठी झुरणारी, आणि अनेकदा सामाजिक व्यवस्थेपुढे हतबल ठरणारी. तिची भावना तीव्र आहे, पण ती त्या भावना व्यक्त करू शकत नाही. तिचं मौन अधिक बोलकं आहे असे म्हणता येईल.
4. प्रेमिकांचे पात्रं:-
उत्तमच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया त्याच्या आत्मशोधात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या एकीकडे प्रेम, स्नेह, समजून घेणं यांचं रूप असतात, तर दुसरीकडे सामाजिक अडथळ्यांचंही प्रतीक होतात.
5. मित्रमंडळी आणि गावकरी:-
उत्तमचे मित्र, गावातील कार्यकर्ते, राजकारणी ही पात्रं सामाजिक संरचनेचं प्रतिनिधित्व करतात. कोणी मार्गदर्शक ठरतात, तर कोणी फसवतात.
III. ‘वेडा’ या कादंबरीचे स्वरूप
‘बेडा’ ही कादंबरी प्रवासात्मक आत्मकथन प्रकारात मोडते. या कादंबरीचे कथानायक उत्तमचा प्रवास बालपणापासून तरुण वयात होणाऱ्या वैचारिक परिपक्वतेपर्यंत पोहोचते. या कादंबरीत लेखक अशोक पवार यांनी त्यांच्या आत्मानुभवाचा वापर करून वास्तवाची सशक्त मांडणी केली आहे. या कादंबरीची भाषाशैली संवादात्मक आहे, वाचकाला पात्रांशी जोडणारी. स्थानीय बोलीभाषा, ग्रामीण जनजीवनाचे तपशील, आणि संवादामधील सहजता या कादंबरीच्या शैलीला जिवंत करताना दिसतात. या कादंबरीत गद्य, आत्मकथन, टीका, आणि विश्लेषण यांचे प्रभावी मिश्रण आलेले आहे.
अशोक पवार लिखित ‘बेडा’ ही कादंबरी केवळ एका बहुरूपी समाजाच्या कथा-कहाण्यापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण ग्रामीण समाजाच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर झगझगीत प्रकाश टाकणारी साहित्यकृती आहे. या कादंबरीमध्ये राजकारण आणि भ्रष्टाचार या दोन मुख्य घटकांच्या आधारे समाजाचे शोषण कसे केले जाते, याचे उत्तम चित्रण केलेले आहे.
IV. ‘बेडा’ या कादंबरीची वैशिष्ट्ये
1. वास्तवदर्शी चित्रण:-
‘बेडा’ या कादंबरीतील बहुरूपी समाजाचे चित्रण कल्पनेवर नाही, तर वास्तवावर आधारित आहे. भूक, व्यसन, जातीयता, अंधश्रद्धा, दारिद्र्य आणि सामाजिक प्रतिष्ठेची झुंज ही सगळी संकटे वास्तवात आहेत आणि लेखकाने ती वस्तुनिष्ठपणे मांडलेली देखील आहेत.
2. जातीय संरचना आणि शोषण:-
‘बेडा’ ही कादंबरी जातपातांच्या कुचंबणीत अडकलेल्या समाजाचे चित्रण करते. बहुरूपी समाजाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी दूषित आहे. ही कादंबरी जातिव्यवस्थेवर मार्मिक टीका करते. जी केवळ शाब्दिक नाही, तर भावनिक आणि सामाजिक पातळीवर भिडणारी आहे.
3. व्यसन आणि अधोगती;-
‘बेडा’ या कादंबरीतील अनेक पात्रे व्यसनाधीन आहेत. उत्तमचे वडील, उत्तमचे नातेवाईक, मित्र, गावकरी या सगळ्यांचे जीवन दारू, गांजा, तंबाखू यांत अडकलेले आहे. हे व्यसन समाजाच्या अधोगतीचे कारण बनलेलं आहे. उत्तमसारखा तरुणदेखील या विळख्यात अडकतो. पण महत्त्वाचे म्हणजे लेखकाने केवळ दोषारोप न करता त्या अधोगतीमागील सामाजिक कारणांचा शोध घेतलेला आहे.
4. अंधश्रद्धा आणि खोटे धार्मिक वर्चस्व:-
बहुरूपी समाजातील लोकांच्या कलेचा उपयोग अनेकदा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी होतो. भोंदू बाबा, देवीचे चमत्कार, झोत घालणे, बड्या लोकांनी देवाचे रुप धारण करून भक्तांना फसवणे या सगळ्यांचा परिणाम बहुरूपी समाजाच्या मानसिकतेवर होतो. वेडा या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने अंधश्रद्धेवर अत्यंत मार्मिक आणि धारदार भाष्य केलेले आहे.
5. राजकारण आणि शोषण:-
गावकऱ्यांना, विशेषतः बहुरूपी समाजाला, राजकीय नेते केवळ मतांसाठी वापरतात. त्यांची प्रगती किंवा शिक्षण ही नेत्यांच्या अजेंड्यावर नाही. ‘बेडा’ या कादंबरीत आलेले राजकारण म्हणजे केवळ दिशाहीन व पोकळ वचनबाजी आहे.
6. शिक्षणाचा संघर्ष:-
शिक्षण ही ‘बेडा’ या कादंबरीतील एक आशेची किरण आहे. या शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात अनेक चांगले बदल होऊ शकतात. पण त्या शिक्षणाला मिळणारा विरोध, जातीय त्रास, आर्थिक दुर्बलता यामुळे शिक्षण म्हणजे संघर्ष ठरतो. उत्तमची झुंज ही शिक्षणासाठी आहे, पण ती झुंज माणूसपणासाठीही आहे.
V. समिक्षात्मक निरीक्षण:-
‘बेडा’ ही कादंबरी आधुनिक मराठी साहित्यातील एक क्रांतिकारी सामाजिक दस्तऐवज आहे. ही कादंबरी केवळ एका पात्राचा आत्मवृत्तांत नाही, तर एक शोषित, उपेक्षित समाजाचा सामूहिक आवाज आहे. लेखक अशोक पवार यांनी कोणतीही काव्यात्म भाषा वापरलेली नाही, तरीही त्यांच्या शब्दांत असलेली धार, सच्चेपणा आणि अनुभवांची उभीकरण शक्ती वाचकाला थक्क करते. काही मर्यादा सांगाव्यात तर, कधी कधी संवाद रुढ होतो, काही प्रसंग दीर्घ वाटतात, पण तरीही या कादंबरीचा सामाजिक प्रभाव प्रचंड मोठा आहे.
निष्कर्ष:-
‘बेडा’ ही केवळ एक कादंबरी नाही, ती एक वैचारिक चळवळ आहे. उत्तमचा प्रवास म्हणजे त्या प्रवासात सामील असणाऱ्या हजारो बहुरूपींचा आणि अन्य उपेक्षित समाजगटांचा प्रवास आहे. ही कादंबरी आपल्याला विचार करायला भाग पाडते. आपण कोणत्या समाजात राहतो? आपण कलेला, व्यक्तीला, माणूसपणाला कितपत मान देतो?
‘बेडा’ ही अशी कादंबरी आहे की जी वाचकाच्या मनात खोलवर उतरते, आणि अनेक दिवस तिथेच राहते.
मनेश तुकाराम लिंबोरे
शिशक :- तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे तालुका उरण जिल्हा रायगड. नवी मुंबई, पिन कोड ४००७०२



