✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100
म्हसवड(दि.1जुलै):-खटाव आणि माण या कायम दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा किंवा नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गत नवीन मालिका २७ मध्ये समावेश करुन लागणारा सर्व निधी मिळावा अशी मागणी जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांच्याकडे केली. लवकरच याबाबत निर्णय घेऊन जिहेकठापूर योजना पूर्ण करण्याचे अश्वासन मंत्री शेखावत यांनी दिले.
जिहेकठापूर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मी गेल्या १२ वर्षांपासून सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या योजनेच्या वाढीव खर्चाला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे काम राज्यातील मागील भाजपा सरकारने केले होते. आजपर्यंत या योजनेसाठी ६१७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. महिनाभरात अंशत: योजना कार्यान्वित करुन नेर धरण आणि येरळा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेची उर्वरित कामे करण्यासाठी आणखी ६४२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. लागणारा हा निधी त्वरित मिळण्यासाठी जिहेकठापूर उपसा सिंचनचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करावा, त्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आता या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून मान्यता मिळावी अशी मागणी केंद्रीय मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांच्याकडे केली.
दिल्ली येथे मंत्र्यांच्या दालनात याविषयीचे निवेदन देताना जिहेकठापूर योजना लवकर पूर्ण होणे माण आणि खटाव तालुक्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे त्यांना सांगितले. या योजनेसाठी नाबार्डमधून यापूर्वी ६५ कोटींचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले होते. आता लागणारे ६४७ कोटी नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकासनिधीतून मिळावेत अशी मागणीही मंत्र्यांकडे केली. केंद्र शासनाकडून जिहेकठापूरसाठी लागणारा उर्वरित निधी प्राप्त झाल्यावर नेर उपसा सिंचन १ आणि २ तसेच आंधळी बोगद्यातून पाणी माणमधील आंधळी धरण आणि माण नदीत सोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आंधळी धरणातून पाणी उचलून उत्तर माणमधील गावांची तहान भागविणारी आंधळी उपसा सिंचन योजना तसेच योजनेच्या दुसऱ्या उर्ध्वगामी नलिकेची कामे वितरण व्यवस्थेसह पूर्ण होणार आहेत. केंद्रीय मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांनी जिहेकठापूर योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा ६४७ कोटींचा निधी लवकरच देण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. राहुल कुल उपस्थित होते.