पुरोगाम्यांनो, पुरोगामीत्वाची अंडी घरातच उबवत बसा !

432

 

*दत्तकुमार खंडागळे* संपादक वज्रधारी, मो. 9561551006

जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव सर यांना माफी मागायला लावलेला व्हीडीओ काल पाहिला आणि डोळ्यात पाणी आले. मनाला खुप वेदना झाल्या. टिनपाट लायकीचे लोक त्यांच्याशी ज्या पध्दतीने बोलत होते ते पाहून खुप अस्वस्थ झालं. ज्या महारावांनी आयुष्यभर चळवळीचा विचार जपला, व्रतस्थ पत्रकारिता केली, पत्रकारितेचा कधी बाजार भरवला नाही. जीवावर उदार होत पत्रकारिता केली त्या महारावांच्या कार्यालयात झुंड घुसते, दादागिरी करते आणि माफी मागायला लावते हे भयंकर आहे. “या महाभागाने माफी मागितली नसती तर मारला असता, ठोकला असता, तोंडाला काळं फासलं असतं. चोप दिला असता ! अशी भाषा वापरत धाकदपटशहीने महाराव सरांना झुंड माफी मागायला लावते. हा प्रकार प्रंचड वेदनादायी आहे. कोण हा शिरवाडकर ? देशाचा मालक लागून गेला की इथला हुकूमशहा लागून गेला ? महाराव जे बोलले आहेत त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. ते चुकीचं असेल तर कोर्ट त्यांना फासावर देईल, गोळ्या घालेल, मृत्यूदंड देईल अन्यथा जन्मठेप सुनावेल. न्यायदानाचा अधिकार या शिरवाडकरला कुणी दिला ? कुणाच्याही कार्यालयात घुसून दादागिरी करत माफी मागायला लावली जात असेल तर इथं लोकशाहीचे मढे पडले आहे असेच समजावे लागेल. अशी गुंडगिरी, झुंडशाही निकोप लोकशाहीला घातक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर या गुंडांचा माज सुरू आहे. फडणवीसांनी या भाजपाच्या गुंडांना पिस्तुलं वाटावीत. देवेद्रजी, विरोधात विचार मांडणारा एक माणूस जीवंत ठेवू नका. राज्यात फक्त गायचे आणि फडणवीसांचे शेण खाणारे लोकच जीवंत असले पाहिजेत. असली शेणखाऊ जमात सोडून कुणालाच बोलायचा अधिकार नाही. इतर कुणी बोलले तर आम्ही घरात घुसून मारू, हाणू, काळं फासू असली प्रवृत्ती जास्त बळावतेय. हे बळ फडणवीसांचे आहे. ही झुंडशाही धोकादायक आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतोय.

हा कुणी शिरवाडकर आहे तो फडणवीसांच्या बुडाखाली आहे. तो भाजपाचा नेता आहे. सत्ता त्यांंच्या हातात आहे, गृहखाते त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच ही हिम्मत होतेय. शिरवाडकर जाताना सोबत झुंड घेवून गेले आहेत आणि महरावांना माफी मागायला लावल्याचा पुरूषार्थ सांगत आहेत. हे चित्रच भयंकर आहे. या देशातली लोकशाही मेल्याचे आणि न्यायव्यवस्था नपंसुक झाल्याचे दिसत आहे. कुणीही माकडतोंड्या उठणार, झुंड घेवून कुणाच्याही कार्यालयात घुसणार आणि मारीन, ठोकीन, काळं फाशीन नाहीतर माफी माग असं करत असेल तर काय बोलावं ? हा प्रकार न्याय व्यवस्थेचा, लोकशाहीचा मुडदा पाडणारा आहे. कुणीही स्वत:च उठून न्यायदान करायला लागलं, न्याय मिळवायला लागलं तर न्यायालये हवीत कशाला ? न्यायालयांवरती भाजपाचे झेंडे तरी फडकवा, तिथे संघाची शाखा भरवा नाहीतर तिथे जनावराना मिळणारे भुसकाट, पेंड, पेडीग्री विक्रीस ठेवा. देशात न्याय व्यवस्था असताना हे चालत असेल तर न्यायालयं हवीतच कशाला ?

जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव आयुष्यभर पुरोगामी विचार मांडत राहिले, तो विचार जगले. त्यांच्यावर झुंडशाहीचा प्रयोग होत असेल आणि पुरोगामी चळवळ थंड असेल तर हे दु:खद आहे. आजवर पुरोगामी चळवळ अशीच मुग गिळून गप्प बसत आलीय. एकेक विचारवंत मारला तरी आम्ही उसळत नाही. फक्त सभा-संमेलनात विचार मांडायचे, भाषण ठोकायची आणि घरात चिडीचुप बसायचे. याचा फायदा नेहमीच हे भामटे घेत आलेत. त्यांनी विचाराला विचाराने कधीच उत्तर दिले नाही. त्यांनी माणसं मारली तरी आम्ही भ्याडांनी म्हणायच, “माणूस मेला म्हणून विचार मरत नाही !” चार दोन दिवस नाटकं करायची. “आम्ही सारे दाभोळकर ! आम्ही सारे पानसरे !” म्हणत टोप्या घालायच्या, मोर्चे काढायचे आणि शेपट्या घालून पुन्हा घरात बसायचे. कधीच समर्थपणे या झुंडींना आम्ही धडा शिकवला नाही. आता एकदा, “आम्ही सारे नपुंसक, भ्याड आणि षंढ !” अशा घोषणा देत मोर्चा काढायला हवा. कालच्या प्रकाराने केवळ महाराव हतबल झाले नाहीत तर अख्खी पुरोगामी चळवळ हतबल झाली आहे, खचली आहे. त्यांच्यावर ही वेळ येत असेल तर भविष्यात कुठले विचारवंत पुढे येणार नाहीत. बोलणार नाहीत, आपले विचार मांडणार नाहीत. कोण आपला जीव द्यायला तयार होणार नाही. पुरोगाम्यांनी दांभिकपणा सोडायला हवा. पुरोगामीत्वाचा आवाज बुलंद करायला हवा. कालच्या प्रकारावर राज्यातील कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार पुरोगामी चळवळीचे सगळे क्रेडीट घेतात मग या चळवळीला ताकद आणि पाठबळ द्यायला मागे का पडतात ? पुरोगामी विचार सोईसाठी वापरतात. जितेंद्र आव्हाडांनी पुरंदरेंच्या बाबत जोरदार आवाज उठवला तेव्हाही अख्खा राष्ट्रवादी पक्ष मुग गिळून गप्प बसला होता. आव्हाड पक्षात एकाकी पडले. पक्षाने सांगितले की ते त्यांचे मत आहे, त्यांची भूमिका आहे पक्षाची नाही. रयत मध्ये प्राध्यापक म्हणून काम करणा-या मृणालिणी आहेर यांच्यावर ही अशीच वेळ आली. लढणारे आणि बोलणारे पुरोगामी कार्यकर्ते एकाकी पडताना दिसत आहेत. इतर पुरोगामी चळवळ किंवा पक्ष त्यांना ताकद देताना दिसत नाहीत. पुरोगाम्यांनी इथून पुढे पुरोगामीत्वाची अंडी घरातच उबवत बसावे. बाहेर येवून कुणाला पुरोगामी विचार सांगूही नये आणि बोलूही नये. चळवळीचे अनेक तुकडे पडलेत. जातीचे पुरोगामी, मतीचे पुरोगामी, ओपन पुरोगामी, दलित पुरोगामी, ओबीसी पुरोगामी, पक्षीय वळचणीचे पुरोगामी अशा विभागण्या झाल्या आहेत. त्त्यातच या भडव्यांना जिचा धाक वाटत होता त्या संभाजी ब्रिगेडचीही दोन शकले झाली आहेत. नेमका त्याचाच फायदा हे भामटे उचलत आहेत.
पुरोगामी विचार सांगणारे कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवाले ढोंगी आहेत. सोईने भूमिका घेतात. त्यांना निवडणूका आल्या की फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव आठवते. निवडणूका जिंकण्यासाठीच ब्राम्हण-ब्राम्हणेतर कार्ड खेळायचे आणि ज्यावेळी ताकद द्यायची वेळ येते, भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची दातखिळी बसलेली असते. हा ढोंगीपणा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने सोडायला हवा. नसेल तर तुमच्या आतल्या चड्ड्या संघाच्याच आहेत हे तरी मान्य करा. हे पक्ष राज्यातील पुरोगामी विचारांच्या मतांच्या जीवावर राजकारण करतात. पुरोगामी मतांच्या जोरावर सत्तेत जाऊन स्वत:चे बुड शेकतात. नेमकी भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा चिडीचुप राहतात. हे चुकीचं आहे. पुरोगामी चळवळ आणि ती चालवणारी माणसं जीवंत राहिली तरच भाड्यांनो तुमच अस्तित्व राहणार आहे. नाहीतर संघाच्या नाडीला गळफास घ्यावे लागतील याचे भान ठेवा.