✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.5एप्रिल):-शहरातील जिल्हा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील तालुका वकील संघाची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यामध्ये अध्यक्षपदी अॅड.मिलिंद क्षिरसागर आणि सहसचिवपदी अॅड.भुषण साळवे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर, उर्वरित कार्यकारणी प्रत्यक्ष मतदान घेऊन निवडण्यात आली आहे.
त्यानुसार सचिवपदी अॅड.प्रल्हाद डुमरे, उपाध्यक्षपदी अॅड.प्रसाद शेटे आणि कोषाध्यक्ष म्हणून अॅड.संतोष मुंढे यांची निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष मुंडे यांनी, तर सहाय्यक म्हणून गोपीचंद पोळ काम पाहिले. त्यामुळे तालुक्यातील सर्व वकील मंडळींकडून नवनिर्वाचित कार्यकारिणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जेष्ठ विधिज्ञ यांनीही नव्या कार्यकारणीचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अॅड.क्षिरसागर हे अभ्यासू विधिज्ञ म्हणून ओळखले जातात. ते गेल्या अनेक वर्षांपासून वकीलचा सराव करत आहेत. मितभाषी, संयमी आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. तसेच गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे ते कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम पाहातात. त्यामुळे विविध क्षेत्रात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. यापूर्वीही, वकील संघाच्या विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याकडे त्यांचा विशेष कल असतो. नुकतीच त्यांची केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने भारत सरकारच्या नोटरीपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचा वकील म्हणून प्रवास, यशस्वी कारकीर्द, व्यक्तीमत्व आणि स्वभाव ही गुण वैशिष्ट्ये पाहून सर्व विधिज्ञांच्या वतीने त्यांची वकील संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ॲड.क्षिरसागर यांच्याकडे दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे अनेक खटले आहेत. अत्यंत अभ्यासू परंतु मितभाषी आणि संयमी विधिज्ञ म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. सामाजिक कार्यात सुध्दा त्यांचा नेहमी सहभाग असतो. कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी ते सातत्याने व्याख्याने देत असतात. विविध शाळा आणि महाविद्यालयात त्यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित केले जाते. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय्य वागणूक देऊन त्यांच्याकडील कागदपत्रांच्या व माहितीच्या आधारे खरी व सत्य माहिती परखडपणे सांगून योग्य तो कायदेविषयक सल्ला देऊन समाधानाने प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते अविरत झटत असतात. अन्यायाविरुद्ध लढणारे वकील म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे त्यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड सार्थ असल्याची भावना अनेक विधिज्ञांनी व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना ॲड.क्षिरसागर म्हणाले की, गंगाखेड वकील संघाला मोठी परंपरा आहे. एकात्मता, बंधुता आणि भाईचारा या त्रिसूत्रींवर कृतीशीलपणे कार्यरत असलेला वकील संघ म्हणून अवघ्या जिल्ह्यात ओळख आहे. आम्ही सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात कार्यरत आहोत. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून काम करीत असतो. त्यामुळे आमचे एकमेकांशी सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. वैयक्तिक माझ्यासाठी तर, गंगाखेड वकील संघ हा माझ्यासाठी केवळ वकील संघ नसून माझे कुटुंब आहे. याच भावनेतून मी सर्वांशी वागत-बोलत असतो. तरीही येत्या काळात सर्व वकील बंधू आणि भगिनींच्या सोबतीने तसेच सहकार्याने पारदर्शक व गतिमान कारभार करण्यासाठी कटिबद्ध आहे. वकील मंडळींनी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद! तसेच आपण टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन.
आजपर्यंत वकील संघाच्या अध्यक्षपदाची अनेक तज्ज्ञ व प्रसिद्ध मंडळींनी धुरा सांभाळली आहे. त्यामुळे तीच परंपरा आणि वारसा पुढे योग्य पध्दतीने घेऊन जाण्यासाठी विद्यमान अध्यक्ष या नात्याने कायम तत्पर असेन. तसेच वकील संघाचे हित आणि कायद्याची जनजागृती करण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचाही मानस आहे. त्यात वकील संघातील सर्वजण खंबीर साथ देतील, असा ठाम विश्वास आहे. तसेच वकील म्हणून आमच्यात असणारे हे प्रेमळ ऋणानुबंध असेच कायम जपण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. तरीही, सर्व वकील बांधवांनी केलेली बिनविरोध निवड आणि टाकलेला विश्वासाचे आभार शब्दात मांडता येणार नाहीत, याची मला जाणीव आहे. त्यामुळे कायम त्यांच्या ऋणात राहीन. मात्र, वकील संघाची उज्ज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम तसेच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही ॲड.क्षिरसागर यांनी स्पष्ट केले.
यावेळी गोविंद आळनुरे, रमेश मोहोळकर, उदय चौधरी, माधव दहिफळे, भागवत मुंडे, अमित कचवे, विवेक निळेकर, सय्यद सादिक, संदीप पाठक, राजाभाऊ शिंदे, अनिल सावंत, सुधीर मुंडे, लहू कुलकर्णी, हनुमान जाधव, लक्ष्मण केंद्रे, गोविंद पैके, नंदकुमार काकांनी, स्मिता देशमुख, सत्यभामा पारवे, छाया शिंदे, धनंजय उकडगावकर, रावसाहेब वडकीले, गणेश बोबडे, धनंजय स्वप्ने, सुनील सावंत, पंकज भंडारी, भागवत फड, अजिमुद्दीन सिद्दिकी, अमृत गौरशेटे, ज्योतिर्लिंग डिगे, दुर्गादास कुकडे, मनोज काकांनी, शेख मुस्तकीन, सतीश ढेरे ,राजेश गरुड, तनवीर शेख, भगवान गुट्टे, शिवाजी राठोड, चंद्रकांत मनदोडे, शिवसाम महाजन, सुप्रिया मुंडे, आदिनाथ मुंडे, मंगल प्रधान, श्रीकृष्ण पवार, आबासाहेब मर्गीळ, कुलदीप टेंगसे, विलास आदोडे, हरीश फड, विजय कांबळे आणि नसीर पठाण यांच्यासह सर्व विधिज्ञांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



