केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( युपीएससी ) नागरी सेवा परीक्षा – २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. दरवर्षी विविध पदांकरिता आयोगाकडून परीक्षा घेतली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. युपीएससीने २०२४ च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह ११३२ पदांसाठी भरती जाहीर केली होती. यामध्ये १००९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात ७२५ पुरुष आणि २८४ महिलांचा समावेश आहे. म्हणजेच ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महिलांचे हे यश नक्कीच सुखावणारे आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांत महाराष्ट्रातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांत समावेश आहे. पहिल्या शंभर यशस्वी विद्यार्थ्यांत ७ मराठी विद्यार्थी आहेत.
महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. पूर्वी या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांत मराठी विद्यार्थ्यांची संख्या नगण्य होती पण मागील काही वर्षांपासून या परीक्षेतही मराठी मुलांनी बाजी मारून मराठी मुलेही कशात कमी नाही हे दाखवून दिले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा अतिशय कठीण असते. नागरी सेवेमधील ही सर्वोच्च परीक्षा असून या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढे जाऊन प्रशासकीय अधिकारी होतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी खूप मेहनत घेतात रात्रीचा दिवस करतात. १२ ते १८ तास विद्यार्थी अभ्यास करतात त्यातून त्यांना हे यश मिळते. या परीक्षेत यश मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्येक विद्यार्थी पाहतो आणि जेंव्हा हे स्वप्न साकार होते तेंव्हा त्याचा आनंद फक्त त्या विद्यार्थ्याला नसतो तर त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना, मित्र मंडळींना आणि समाजालाही असतो. असाच आनंद बिरदेव डोणे या गरीब मेंढपाळ असलेल्या विद्यार्थ्याला मिळालेल्या यशानंतर संपूर्ण महाराष्ट्राला झाला आहे. बिरदेव डोणेने जे यश या परीक्षेत मिळवले आहे ते प्रेरणादायी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातीलच मराठी शाळेत झाले. दहावी बारावीत चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने रात्रीचा दिवस केला. पहिल्या दोन प्रयत्नात त्याला यश मिळाले नाही मात्र तिसऱ्या प्रयत्नात मात्र तो यशस्वी झाला आणि देशात ५५१ वी रँक मिळवली. केवळ बिरदेवचीच नव्हे तर या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्वच मराठी मुलांची कहाणी प्रेरणादायी आहे.
जिद्द आणि ईच्छाशक्तीला मेहनतीची जोड मिळाली तर या जगात काहीही अशक्य नाही हेच या मुलांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील या मुलांचे यश पाहून भविष्यात महाराष्ट्रातून आणखी सनदी अधिकारी निर्माण होतील यात शंका नाही. या परीक्षेत यशस्वी झालेले बहुतेक विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकलेले आहेत हे विशेष. लाखो रुपये डोनेशन भरून इंग्रजी माध्यमात आपल्या मुलांना दाखल करणाऱ्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले तरच करियर होते असा समज असणाऱ्यांसाठी तर ही मोठी चपराक आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन! सनदी सेवेमध्ये मराठी मुलांचे हे यश पाहून ‘ मराठी पाऊल पडते पुढे! ‘ असेच म्हणावे लागेल.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५



