चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू 

62

भारताचा क्रमांक एकचा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे आणि भारताला खरा धोका चीनपासूनच आहे असे विधान १९९८ साली भारताचे तत्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी केले होते. जॉर्ज फर्नांडिस हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. २८ वर्षापूर्वी जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेल्या विधानावर आज अमेरिकन सुरक्षा गुप्तचर यंत्रणेने शिक्कामोर्तब केले आहे. या यंत्रणेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात त्यांनी नमूद केले आहे की भारताचा मुख्य शत्रू हा पाकिस्तान नसून चीन आहे आणि भारताला खरा धोका चीनपासूनच आहे. भारताने चीनशी सावध वागावे.

अमेरिकन सुरक्षा गुप्तचर यंत्रणेच्या या अहवालावर जाणकार लोकांना आश्चर्य वाटणार नाही कारण आंतरराष्ट्रीय आणि सुरक्षा विषयक जाणकार देखील नेहमी हेच सांगत आले आहे की आपला मुख्य शत्रू चीन आहे अर्थात पाकिस्तान आपला शत्रू आहे यात वाद नाही. १९४८, १९६५, १९७१, १९९९ साली आपण पाकिस्तानशी युद्ध केले आणि पाकिस्तानला पाणी पाजले आताही सिंदूर ऑपरेशन मध्ये आपण त्याचीच पुनरावृत्ती केली. पाकिस्तान आपला शत्रू असला तरी प्रत्यक्ष लढाईत पाकिस्तान भारतासमोर टिकू शकत नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. असे असले तरी पाकिस्तान दरवेळी आपली कुरापत काढतो कारण त्यांच्यामागे चीन आहे.

आताही पहलगाम हल्ल्याचा संपूर्ण जगाने निषेध केला तरी चीनने त्यावर अवाक्षर ही काढले नाही इतकेच नाही तर त्यानंतर झालेल्या लढाईतही चीनने पाकिस्तानलाच पाठिंबा दिला आणि पाकिस्तानच्या पाठीशी चीन खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली. आता अमेरिकन सुरक्षा गुप्तहेर संघटनेने दिलेल्या अहवालावर भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी भारत हा अहवाल गांभीर्याने घेणार यात वाद नाही. कारण चीन हा किती विश्र्वासघातकी देश आहे याचा अनुभव आपण १९६२ साली त्यानंतर वेळोवेळी घेतला आहे. आताही चीन अधूनमधून भारताच्या कुरापती काढतच असतो. भारताचा सख्खा शेजारी असणारा पण भारताला कायम पाण्यात पाहणारा चीन सतत काही ना काही खोड्या काढून दोन्ही देशातील तणाव वाढवत असतो. हे आताच नाही तर १९६२ पासून चालू आहे.

१९६२ साली भारताशी मैत्रीचा हात पुढे करून हिंदी चिनी भाई भाई म्हणत त्याने भारताचा केसाने गळा कापला. त्यानंतरही त्याने भारताच्या सतत खोड्या काढून भारताला त्रास दिला. कधी त्याने भारतात घुसखोरी केली तर कधी त्याने सीमेवर नवीन गावे वसवली तर कधी भारतातील गावांना चिनी नावे देऊन ती गावे चीनच्या हद्दीत असल्याचा दावा केला अर्थात चीनच्या या दाव्याला किंवा खोडसाळपणाला भारताने कधी भीक घातली नाही तरीही त्यांचा खोडसाळपणा कमी झाला नाही उलट वाढतच गेला. दोन वर्षापूर्वी चीनने भारतातील लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील काही गावांना चीनच्या नकाशात दाखवले होते. इतकेच नाही तर त्या गावांना चिनी नावे देखील दिली होती. चीनच्या या खोडसाळपणाची भारताने तातडीने दखल घेऊन त्याचा निषेध केला होता.

भारताच्या निषेधानंतरही चीनने भारताच्या खोड्या काढणे बंद केले नाही. मागील वर्षी चीनने भारताच्या लडाखमध्ये दोन नव्या काऊंट्याची घोषणा करत घुसखोरी केली. भारताच्या हे लक्षात आले भारतीय लष्कराने आणि परराष्ट्र मंत्रालयाने याचा चीनला जाब विचारला. चीन एवढ्या वरच थांबला नसून चीनने भारताशी वॉटर वार सुध्दा सुरू केले असून चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर मोठा जल प्रकल्प सुरू केला आहे या जल प्रकल्पामुळे भारताला भविष्यात मोठ्या जल संकटाला सामोरे जावे लागणार आहे . दुसऱ्यांच्या खोड्या काढून गंमत पाहण्याची चीनची जुनी खोड आहे. अशी खोड तो फक्त भारताचीच काढतो असे नाही तर इतर देशांचीही काढतो मात्र आशिया खंडातील विशेषतः भारताच्या शेजारील काही देशांना त्याने वारेमाप कर्ज देऊन तर काही देशांना धाक दाखवून त्याने गप्प बसवले आहे. भारत मात्र त्याच्या या खेळीला बळी पडत नाही म्हणूनच तो अशा खोड्या अधून मधून काढत असतो.

भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि लडाखवर चीनचा डोळा आहे इतकेच नाही तर अरुणाचल प्रदेश हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीनने अनेकदा केला आहे. चीनच्या झाऊझंग येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत भारताने खेळण्यास नकार दिला त्यावेळी चीनने अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना स्टेपल व्हिसा दिला होता. स्टेपल व्हिसा देऊन त्यांनी एकप्रकारे भारताला डिवचले होते. त्या आधी लडाखमध्ये चिनी सैन्य घुसवले होते तेंव्हा दोन्ही देशातील सैन्य एकमेकांपुढे उभे ठाकले होते केंव्हाही युद्धास तोंड फुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी झालेल्या धुमश्चक्री नंतर चिनी सैन्य भारताच्या हद्दीतून निघून गेले होते. मात्र सीमेवर त्यांच्या हालचाली कायम चालू असतात. मुळात चीन हा जगातला सर्वात कपटी देश आहे. चीनला जगातील महासत्ता व्हायचं आहे त्यासाठी त्याने विस्तारवादी भूमिका स्वीकारली आहे त्यामुळेच तो शेजारील देशांची जमीन आणि मालमत्ता बळकावीत आहे.

त्यांच्या या विस्तारवादी धोरणाला जर कोणी आडकाठी आणणार असेल तर तो भारत आहे हे चीन जाणून आहे म्हणूनच तो भारताच्या अधूनमधून खोड्या काढून भारताला त्रास देत असतो अर्थात त्याच्या या खोड्यांना भारत आता बधणार नाही कारण आजचा भारत हा १९६२ चा भारत नसून २०२५ चा भारत आहे. जरी चीनचे लष्करी सामर्थ्य भारतापेक्षा अधिक असले तरी चीनच्या आरे ला कारे करण्याची हिंमत या भारतात आहे.          

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५