▪️शिवराज्याभिषेक दिनानिमित्त केले आयोजन
▪️पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य व शिष्टाचार विषयी विद्यार्थांनी जाणुन घेतली माहिती
✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.6जुन):-ॲड.मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता महाराष्ट्र (म.रा.) यांच्या संकल्पनेतून संपुर्ण राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये आभासी पद्धतीने शिव राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त पंच परिवर्तन या विषयावर विविध व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (म.रा. ) हे या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. सदर कार्यक्रम आभासी पद्धतीने विद्यार्थांना दाखवण्यात आला.
त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा येथे शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम निमित्ताने पंच परिवर्तन या विषयातील पर्यावरण संरक्षण या विषयावर प्रमूख वक्ते म्हणून बादल बेले, राज्याध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच नागरी कर्तव्य व शिष्टाचार या विषयावर ऍड. राजेंद्र जेनेकर, माजी सचिव, राजुरा तालुका बार असोसिएशन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. बी. डोंगरवार प्राचार्य, शासकिय औ. प्र. संस्था राजुरा यांची उपस्थिती होती. तर उद्घाटक म्हणून अरविंद बरूआ, आय.आर. दालमिया सिमेंट ग्रुप, प्रमुख अतिथी म्हणून सुधीर रंजन मोहनती, एच.आर.ए. हेड, दालमिया सिमेंट, प्रश्नांत भिमनवार, सी. एस. आर. विभाग दालमिया सिमेंट, रमेश रोडे, प्र. गटनिदेशक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वृक्षभेट देऊन उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेंडे, शिल्प निदेशक व शंकर मद्देलवार, शिल्प निदेशक यांनी केले. प्रास्तावीक रमेश रोडे यांनी तर आभारप्रदर्शन संतोष अवधाते, शिल्प निदेशक यांनी केले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रदूषण व हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर झाडे लावणे, स्वच्छता राखणे व नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीच्या कार्याला पर्यावरणाचे अधिष्ठान लाभले होते. रयतेच्या कल्याणासोबत तेथील जमीन, पाणी, वनसंपदा यांच्या जतन आणि संवर्धनासाठी अभूतपूर्व पर्यावरण धोरण महाराजांनी राबविले व पर्यावरण विषयक बाबींकडे विशेष लक्ष दिले असे प्रतिपादन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थाचे राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर बोलतांना व्यक्त केले.
भारत देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठी कायद्याचे पालन, मताधिकाराचा वापर, सार्वजनिक मालमत्तेची काळजी आणि सभ्य वर्तन आवश्यक आहे. भारतीय संविधानाचे जतन करून प्राचीन वारसा जपणे, जागृत राहणे, कर्तव्य जोपासणे असे प्रतिपादन राजुरा तालुका बार असोसिएशन माजी सचिव ऍड. जेनेकर यांनी नागरी कर्तव्ये व शिष्टाचार याविषयावर बोलताना व्यक्त केले.



