जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इरई नदी खोलीकरणाच्या कामाचा आढावा

42

▪️दुसर्‍या टप्प्याचे काम सोमवारपासून

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7जून):- चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 7) संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्या.

व्हीसीद्वारे घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम) अक्षय पगारे, जलेश सिंग (जलसंपदा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते.  

इरई नदीचे खोलीकरण तीन टप्प्यात करण्यात येणार असून यातील पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा माना खदान (लालपेठ कॉलरी) ते नांदगाव पोडे,असा असून सदर कामाला सोमवारपासून सुरवात होईल. तर तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त काम करून खोलीकरणातून निघालेला गाळ त्वरित वाटप करावा. माना खदान ते नांदगाव पोडे टप्प्यासाठी गाळ संचयित करण्याचे ठिकाण उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी निश्चित करण्यासाठी रोज पाहणी करावी. त्याचबरोबर भूमी अभिलेख आणि जलसंपदा विभागाने दुसऱ्या टप्प्यातील आखणी करून त्वरित कामाला सुरवात करावी.  

▪️असे झाले पहिल्या टप्प्यातील काम: 

रामसेतू ते चौराळा पूल दरम्यान 2400 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. यात 70 टीसीएम गाळ उपसा करण्यात आला असून 118 शेतकर्‍यांना 17 हजार ब्रास गाळ वाटप करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 10 पोकलेन, 25 ट्रॅक्टर, 22 टिप्पर कार्यरत आहेत. दुसऱ्या टप्प्यात या यंत्र सामुग्रीसह अतिरिक्त यंत्र सामुग्री वाढविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.