मनाला हवाहवासा वाटणारा तो पहाटेचा गार वारा, ती सूर्याची किरणं, तो पक्षांचा किलबिलाट आणि फुलांचा सुगंध…खरंच एखाद्या कवीला कविता सुचावी असच प्रफुल्लित वातावरण…घड्याळात सहाचा ठोका पडला आणि मला जाग आली. नको असतानाही अंथरूनावरून उठावच लागलं… “स्वप्निल” माझा नवरा, त्यालाही उठवलं. (दोघांनाही कामावर जायचं असल्यामुळे कामाची गडबड व्हायला नको) तेवढ्यात स्वप्निलच्या मोबाईलवर फोन आला. तो अंघोळीला गेला असल्यामुळे मी त्याला आवाज दिला, तुझा मोबाईल वाजतोय. तो म्हणाला, “बघ! कुणाचा आहे?” मी कॉल उचलला, पण कुणीच बोललं नाही. मला वाटल नेटवर्क नसेल कदाचित.
परत तोच नंबर…मी परत हॅलो म्हणताच कॉल कट…मी स्वप्निलला आवाज दिला, नंबर सेव्ह नाही आणि फोन उचलला की कुणीच बोलत नाही. तो म्हणाला काय नंबर आहे? मी त्याला 8766****68 नंबर सांगितला. तो काहीच बोलला नाही. बाथरूम मधून बाहेर येताच मी म्हटल, कुणाचा नंबर आहे? कुणीच बोललं नाही. काही काम असेल, बोलून घे! तो थोडा हसला आणि म्हणाला, तुला खरचं नंबर माहीत नाही. मी म्हटले नाही, कुणाचा आहे? कुणी आपल्या जवळच आहे का? तो म्हणाला, “जवळचा नाही पण आठवणीतला मात्र नक्कीच आहे…” मी म्हटल, तुझी ती का फुग्गा… तो हसला आणि म्हणाला, हो! तीच फुग्गा… मग दोघेही मनसोक्त हसलो. मध्येच मोबाईल वाजला. मी म्हटल, बोलून घे! काही महत्वाचं असेल. तो म्हणाला, नाही…नको…राहू दे…
पण माझ्या म्हणण्यावरून त्याने फोन उचलला. मी उठून कामाला लागणार तोच त्याने हात पकडून मला थांबवलं आणि फोन स्पीकरवर ठेवला. मी म्हटल, अरे तू बोल ना! मला कामं आहेत. तो इशा-याने मला बस् इथेच म्हणाला… त्याने हॅलो म्हणताच तिकडून तिचा आवाज आला. कसा आहेस? ओळखलास का? तो म्हणाला मजेत आहे. ती म्हणाली कॉल कुणी उचलला, माझा नंबर सेव्ह नाही का? तो म्हणाला, नंबरची आता गरज वाटत नाही ग! आणि कॉल माझ्या बायकोने उचलला होता…तू सांग कसा काय एवढ्या वर्षाने कॉल केला? काही काम होत का? ती म्हणाली, नाही रे आठवण म्हणून केला सहज…
तो म्हणाला ठीक आहे. मला कामावर जायला उशीर होतोय, ठेवतो फोन…ती म्हणाली मला बोलावं वाटतं तुझ्याशी, तुला नाही का वाटत?…तो म्हणाला, नाही मला वेळच नसतो बोलायला. ती म्हणाली तू बदललास. तो म्हणाला, “हो! वेळेनुसार प्रत्येकाला बदलावंच लागतं.” ती चिडून म्हणाली, तू माझं आयुष्य बर्बाद केलंस. तो हसून म्हणाला, हे तू तुझ्या मनाला विचार…ती म्हणाली खरंच खुश आहे का तू लग्न करून?…तो म्हणाला, “हो! माझ्या सारख्या फाटकं नशीब असणा-याला जीव ओवाळून प्रेम करणारी प्रेमळ आणि समजूतदार बायको मिळाली, गोंडस मुलगी आमच्या आयुष्यात आली. न मागताच एवढं सगळ पदरी पडल्यावर मी खुश का नाही असणार..?”
तू देखिल तुझ्या आयुष्यात खूप पुढे जा, तुला हव ते मिळव आणि झालं गेलं विसरून जा…तिच्या बोलण्यावरून, आवाजावरून वाटलं ती खूपच चिडलेली असावी… ती रडक्या स्वरात म्हणाली किती सहज बोललास तू..? तुझ्या बायकोला जर आपलं माहीत झालं तर तुझं देखिल आयुष्य बर्बाद होईल. तुझा विचार करूनच मी बोलली नाही तुझ्या बायकोला आणि तू म्हणतोस सगळ विसरून जा… त्याने माझ्याकडे बघितलं आणि परत एकदा स्मितहास्य करत तिला बोलला, तू चिडलेली असली की तुला मी फूग्गा म्हणायचो, तू खरचं फुगा आहेस…अगं! तू हे जे काही बोललीस ना, ते सगळ माझ्या बायकोला आधीच माहीत आहे आणि आता देखिल ती इथे माझ्या जवळच बसलेली आहे. तुला जर तिला बोलायचं असेल तर देतो तिला फोन…
तिने घाबरलेल्या आवाजात नाही, नको म्हणत फोन कट केला…मी म्हटलं बोलत जा रे कधी फोन आला तर… तो हसत म्हणाला, आता फोन करेल असं वाटत नाही. मी मस्करी करत विचारले काय फरक आहे तिच्यात आणि माझ्यात?… तो माझा हात हातात घेत म्हणाला, ती होती आणि तू आहेस… ती फक्त आठवणीत आणि तू आयुष्यात…मी बस् पुरे माझं कौतुक म्हणत त्याच्या हातातील माझा हात बाजूला करून चहाचा कप त्याच्या हातात दिला आणि दोघेही चाय पे चर्चा करत मनसोक्त हसलो…
✒️ॲड.रक्षा नगराळ(राळेगाव)मो:-९५४५१४६९०९



