✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.24जून):-वारीतील प्रेम, आपुलकी, समता, स्वातंत्र्य या मूल्यांचा अनुभव घेण्यासाठी अनेक वर्षांपासून ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम सुरू आहे. संत तुकोबाराय पालखी सोहळ्यात आज (दि. २४) यवत ते वरवंट दरम्यान सामाजिक कार्यकर्ते, विविध भक्तिसंप्रदायातील प्रतिनिधि आणि अनेक क्षेत्रातील मान्यवर एक दिवस चालणार आहेत. त्यामध्ये संत तुकडोजी महाराज यांचे वारसदार सुबोधदादा महाराज, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, प्रवक्ते विकास लवांडे यांच्यासह राज्याच्या सर्वभागातील ५०० जण सहभागी होणार असल्याची माहिती संयोजक अविनाश पाटील, विशाल विमल यांनी दिली.
पंढरपूरची आषाढी वारी हा सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा आहे. या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी गेली १२ वर्षांपासून ‘ एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम आयोजित केला जातो. अनेकांना २१ दिवस वारीत सहभागी होता येत नाही. पण किमान एक दिवस तरी वारीत सहभागी होऊन वारीचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने एक दिवस वारी हा उपक्रम सुरू केला. सामाजिक संस्था, संघटनाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, साहित्यिक, भारतीय भक्तिपरंपरेतील विविध पंथ, संप्रदाय यांचे प्रतिनिधि या उपक्रमात सहभागी होत असतात, असे शरद कदम, वर्षा देशपांडे यांनी सांगितले.
यंदा संत तुकोबाराय पालखी सोहळ्यातील रथामागील दिंडी क्र. २६१ मध्ये एक दिवस वारी असणार आहे. यवत ते वरवंड दरम्यानच्या या वारीत सुमारे ५०० जण सहभागी होणार असणार आहेत. भांडगाव येथे दत्तात्रय बोरकर यांच्या निवासस्थानी दुपारी दिंडी क्र. २८२ मध्ये विसावा असणार आहे. सहभागासाठी विशाल विमल 7276559318 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



