✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.15एप्रिल):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि मानवतावादी विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अध्ययनाचा संकल्प करत त्यांना आदरांजली अर्पण केली.
या विशेष उपक्रमात प्रा. डॉ. मृणाल वऱ्हाडे, डॉ. निलेश ठवकर, प्रा. विवेक माणिक आणि प्रा. नागेश ढोरे यांनी डॉ. आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि समाजप्रबोधनातील योगदान यावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या विचारांची जाणीव वृद्धिंगत होण्यासाठी ‘डॉ. आंबेडकर’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरलेल्या १८ तासांच्या अध्ययन उपक्रमाच्या आरंभापूर्वी विद्यार्थ्यांनी एक विशेष प्रतिज्ञा घेतली. या प्रतिज्ञेद्वारे त्यांनी शिक्षण, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांचा स्वीकार करत सातत्याने ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बीजनकुमार शील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. सरताज शेख आणि श्री. मुकेश घटे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये समाजभान जागृत करण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



