Home चंद्रपूर चिमूर तालुक्यातील आंबोली येथे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा...

चिमूर तालुक्यातील आंबोली येथे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद 

164

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.15मार्च):-महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1” आयोजित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे, त्या अंतर्गत चिमूर तालुक्यातील आंबोली येथे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

 विठ्ठल रुकमीणी सभागृह, आंबोली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजीत करण्यात आले होते. सदर शिबीराचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्रीधर राजमाने उपस्थित होते. या शिबीराला आयुक्त नागपूर विभाग, नागपूर यांचे प्रतिनिधी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी तुषार मटकर यांनी भेट देवून शिबीराची पाहणी केली.  

                                             यावेळी प्रामुख्याने आधार कार्ड, संजय गांधी योजना प्रमाणपत्र, अधिवास, जात, उत्पन्न, राशन कार्ड, विविध दाखले, इतर विभागांचे लाभार्थी यांना शासकीय योजना विषयक लाभाचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाकडून सनद वाटप करण्यात आले. तालुका कृषी विभागाकडून पी. एम. कीसान लाभार्थी व इतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच पोलीस विभागामार्फत सायबर गुन्हाविषय बॅनर व्दारे जनजागृती करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणामध्ये उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी प्रशासन व जनता यातील दरी कमी करुन शासकीय योजना व माहिती प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवीण्याचे काम प्रशासक म्हणून आम्ही करु अशी ग्वाही दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर चिमुर तालुक्यामधील 10 मंडळामध्ये आयोजीत करण्यात आलेला असून सर्व नागरीकांनी याचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविक करताना शिबीरामध्ये देण्यात येणा-या विविध विभागाच्या योजनेची माहिती तहसिलदार श्रीधर राजमाने यांनी दिली. तसेच आंबोळीचे माजी सरपंच वैभाव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी आंबोली मंडळातील ग्रामपंचायतींचे प्रशासक, प्रतिष्ठीत नागरीक तसेच चिमुर तालुक्यातील इतर विभाग प्रमुख व चिमूर तहसिल कार्यालयातील सर्व नायब तहसिलदार, आंबोली मंडळातील मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, महसूल सहाय्यक तसेच विविध योजनाचे लाभार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ अधिकारी संदीप पंचभाई, आणि आभार प ग्राम महसूल अधिकारी संदीप मुंडे यांनी मानले.