

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.15मे):-शहरातील शिवाजी नगर वार्ड क्रमांक ९ मधील पाण्याच्या टॉकीजवळ अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ९ मे ते ११ मे २०२६ दरम्यान घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार घरमालक मुसा शेख यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट व बेडची तोडफोड करून घरातील मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे ३.२ तोळे सोने व २० तोळे चांदी, तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असून एकूण किंमत सुमारे सहा लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. तपासादरम्यान फिंगर प्रिंट, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक तसेच परिसरातील आणि शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी घरांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करून चोरीस गेलेले दागिने परत मिळवावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मुसा शेख यांचे गृह कर्ज आहे. अश्यातच घरफोडीने संपूर्ण परिवारावर आर्थिक संकट कोसळले असून भीतीचे वातावरण आहे.







