▪️‘शून्यातून शून्याकडे’ कादंबरीचे प्रकाशन.
✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.16एप्रिल):-कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय असल्यास उत्कर्ष साधता येतो मात्र काही अपप्रवृत्तीमुळे कामगार चळवळ आणि कंपनी व्यवस्थापन दोन्ही आघाड्या बदनाम झाल्या आहेत, रामदास कोतकर यांनी त्यांचे स्वानुभावातून कादंबरीचे लेखन केले असले तरी त्यातील प्रसंगाचा मी साक्षीदार असल्याने या कामगार लेखकाबद्दल अभिमान वाटतो,* असे गौरव उदगार एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी काढले.
रामदास कोतकर लिखित ‘शून्यातून शून्याकडे’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
याप्रसंगी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, समीक्षक प्रा. डॉ.मेहबूब सय्यद,शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी, एल अँड टी कंपनीचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर संदीप महाजन, धरमपुरी क्षेत्राचे दत्तात्रय कोतकर, कवी गीताराम नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘लेखकाने स्वतः अनुभवलेले, भोगलेले कामगाराचे जीवन मांडल्यामुळे वास्तववादी आणि वाचनीय साहित्यकृती निर्माण झाली आहे. समाजात पसरलेल्या अस्वस्थतेवर कोरडे ओढण्याचे काम ग्रामीण भागातील लेखक रामदास कोतकर यांनी केले असल्याचे गौरवोद्गार डॉ. संजय कळमकर यांनी काढले.
कादंबरी ची समीक्षा करताना प्रा. डॉ.मेहबूब सय्यद सय्यद म्हणाले की, कामगार,कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार तरुणांची व्यथा वेदना चे वास्तववादी चित्रण शून्यातून शून्याकडे या कादंबरीमध्ये आले आहे, उदारमतवादी उद्योगपतींनी कामगार वर्ग जगाला पाहिजे यासाठी त्यांच्या सुखदुःखात सहभाग घेऊन उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला तर युरोपीय भांडवली व्यवस्थेत कामगारांना त्यांच्या श्रमाचा यथायोग्य मोबदला दिला नसल्याने कामगार वर्ग नेहमीच अपेक्षित राहिला आहे. कामगारांचे प्रश्न आणि समस्या कायम आहेत, विषयावर प्रकाश टाकला आहे. ही कादंबरी पुढील काळातील महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून ओळखली जाईल.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाजगे केले. तर आभार सेवानिवृत्त मुख्याध्यापक भानुदास कोतकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर तालुका ग्रामीण साहित्य मंडळाचे संदीप गेरंगे, ॲड. राहुल ठाणगे, बाळासाहेब कोतकर आदींनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमास शब्बीर शेख, गजेंद्र क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



