महात्मा बसवेश्वर यांचा जन्म 25 एप्रिल 1105 मध्ये कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मादिराज मंडीगे तर आईचे नाव मादलांबिका होते. बसवेश्वरांनी लहानपणी वयाच्या 8 व्या वर्षी ‘उपनयन/ मुंज’ करन्यावेळी मोठी बहीण अक्का नागाई चा अगोदर उपनयन करा त्यानंतर माझा करा ! यावर पुरोहित यांनी सांगितले की नागाई ही स्त्री आहे, स्त्री ही शूद्र आहे त्यामुळे तिचे उपनयन होणार नाही. त्यावर बाल बसवेश्वर यांचे उत्तर होते; मी ही स्त्रीपासून जन्म घेतला आहे. स्त्री पुरुष यात भेद करणारी ही विषमता मी नाकारतो! हे उपनयन ही नाकारतो! समतेचे पहिले पाऊल यास म्हटले तरी चालेल!
समतेचे वर्तन करीत आहेत,म्हणून त्यांना व कुटुंबीय यांना त्रास देण्यात आला. पुढे बसवेश्वर घर सोडून कुडलसंगम येथे आले. कुडलसंगम हे मलप्रभा व कृष्णा नदीच्या संगमावर वसलेले कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तेथेच त्यांनी आवश्यक शिक्षण,धनुर्विद्या, वेद,शास्त्र यांचे चिकित्सक अध्ययन केले.त्यांचे मामा बलदेव हे बिज्वल राजाकडे दण्डनायक पदावर होते.मामाची मुलगी गंगाबिका सोबत बसवेश्वरांचे लग्न झाले. बसवेश्वर 16 वर्षाचे असतांना त्यांचे आई वडिलांचे निधन पावले होते .
पुढे बलदेव मामाच्या सल्ल्यानुसार मंगळवेढा (सोलापूर जिल्ह्यातील) येथील बिज्वल राजाकडे कारकून म्हणून नोकरी केली.कामातील निष्ठा,दीर्घउद्योग,प्रामाणिकपणा यामुळे राज्याच्या खजिनदार ते पुढे मुख्यप्रधान या पदापर्यंत गेले.राजधानी कल्याण येथे गेल्यावर राज्याला सुखी, समाधानी आणि प्रजाहितदक्ष बनवण्यासाठी कार्य केले. महात्मा बसवेश्वरांनी समता, न्याय,स्वातंत्र्य, बंधुता या मूल्याच्या अंगीकार केल्यामुळे प्रस्थापित विषमतेचे समर्थन करणारी मनुवादी व्यवस्था हादरली! महात्मा बसवेश्वरांनी एक आंतरजातीय विवाह घडविला.ज्यात ब्राह्मण मधुबारस यांची मुलगी लावण्यवती जीचे चांभार हरळ्याचा मुलगा शिलवंत यांच्या सोबत त्यांच्या आईवडील व अनुभवमंडप संमतीने लग्न लावले. मात्र सनातनी भटांनी ओरड केली की, बसवेश्वर धर्म बुडवीत आहेत.त्यांनी बीज्वल राजाकडे बसवेश्वर यांच्या विषयी गैरसमज पसरविले. त्यांची तक्रार केली.त्यामुळे मधूवारस व हरळ्या यांची राजाच्या आदेशाने हत्या करण्यात आली.बसवेश्वर यामुळे दुःखी झाले.त्यांनी नोकरी सोडली! पुढे त्यांनी समता प्रस्थापित करण्यासाठी पुढचे पाऊल टाकले.
महात्मा बसवेश्वर यांनी वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था नाकारली. ज्ञान व अधिकार असलेले लोकं हे वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था,लिंगभेद,कर्मकांड याद्वारे शोषण करतात हे महात्मा बसवेश्वरांनी दाखवून दिले.
दया रहीत धर्म कोणता भूवरी।सकळ प्राण्यावर दया किजे।अंतरीची दया।धर्माचा मूळ पाया तोचि एक। कुडलसंगमदेवा।।
जन्म घेताना जनन सुतक, मरणात प्रेत सुतक, रजस्वात रज सुतक,उष्ट्यात उच्छिष्ट सुतक आणि कुळात जाती सुतक हे पाच प्रकारचे घाणेरडे विटाळ अशी वैदिकांची/म्हणजे मनुस्मृतीच्या समर्थकांची धारणा आहे.बसवेश्वरांनी या पंचसुतकाना विरोध केला.
त्या प्रथेला परंपरेला पूर्णपणे नाकारले. पण आज काही भक्त बसवेश्वरांनी सांगितलेल्या मार्गाच्या विरुद्ध वागत तर नाही ना! कारण अनेक व्रत,वैकल्ये, उपास लिंगायत म्हणून घेणारे बांधव करतांना दिसत आहेत!
बसवेश्वर यांचे वचन आहे,
“आकाश एकच वेशीबाहेर आणि वेशीतल्या आतल्यासाठी।
जमीन एकच शूद्र आणि शिवालयासाठी।
पाणी एकच शौच आणि आचमनासाठी।
कुळ एकच स्वतःला जाणून घेण्यासाठी।
पहा हो कुडलसंगमदेवा।।”
वैज्ञानिक दृष्टीने *कुळ* वेगवेगळे नाहीत.आध्यात्मिक दृष्टीने देव वेगवेगळे नाहीत. एकच धरती एकच कुळ आहे, एकच देव आहे.तरीही आजची लिंगायत म्हणून घेणारी बांधव बहिणी बाजारातून विविध धातूच्या मुर्त्या खरेदी करून त्यांना देव समजून त्यांची पूजा करणे,त्यांना रोज चोळून आंघोळ घालणे,असे प्रकार करतांना दिसतात.ज्यांच्याकडे फक्त इस्टलिंग वा महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा असावी असे वाटते!
बसवेश्वर चरित्र लेखक रमजान दर्गा नोंदवितात की, “*बसवप्रज्ञा* म्हणजे विश्वाचा देव एकच आहे ,असा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण करून जातिभेद, लिंगभेद,वर्गभेद,वर्णभेद आणि कुळभेद इत्यादी सारे मिटविणे.मनूस्मृतीचा धर्म सोडून मानव धर्माचा स्वीकार करणे. बसवप्रज्ञा म्हणजेच जीव विरोधी शस्त्र व शास्त्र तसेच मुर्तीपूजेचा त्याग करणे.आपणच आपल्यात नियमबद्ध होऊन जगणे.”
मुहूर्त पाहणे,ज्योतिष/भविष्य यावर वचनातून त्यांनी प्रहार केले आहेत..
पोपटाने भविष्य सांगून उपयोग काय?
कळेना त्याचे त्याला काहीही! मांजर कधी खाईन त्याला काय?
सर्व जग पाहणारे डोळेच डोळे पाहू शकत नाही। दुसऱ्याचे भविष्य सांगणारे ढोंगी कधी स्वतःचेच।भविष्य सांगू शकत नाही। पहा हो कुडलसंगमदेवा।।
*कायाकवे कैलास*
श्रम हेच कैलास आहे. त्यासाठी कोणत्याही तीर्थाला जायची गरज नाही! मंदिरात जाण्याची गरज नाही.याबाबत त्यांचे एक वचन प्रसिद्ध आहे!
“भव्य शिवालय बांधिती सधन।
गरिब मी सान, बांधू कैसे?।
पाय माझे खांब,देह देवालय।
शिर कळस होय,सोनियांचे।
स्थावर असे नाशिवंत,
जंगम नसे नाशिवंत.
ऐका हो कुडलसंगमदेवा।”
(वचन 821)
महात्मा बसवेश्वर यांनी अनुयायांना मंदिर न बांधण्याचा संदेश दिला आहे.आपल्या देहालाच देवालय माना.देवालया पेक्षा देहालय श्रेष्ठ आहे.
महात्मा बसवेश्वर यांचे वचन आहे!
“दगडी नाग दिसता,दुधाने ‘अभिषेक करा’ म्हणती।जिवंत नाग दिसता,मारा मारा म्हणती। भुकेला जंगम आल्यास ‘पुढे जा’ म्हणती। न जेवणाऱ्या (दगडी) लिंगदेवास नैवेद्य धरा म्हणती।
माझ्या कुडलसंगमदेवाच्या शरणगणांना पाहून उदास जे होती,दगडाने ढेकुळ ठेचल्यापरी होई गती।” (वचन 194)
*अनुभवमंटप* पहिली लोकशाही संसद*
महिलांना नाकारलेले सर्व अधिकार, हक्क समतेच्या तत्त्वानुसार देण्यासाठी त्यांनी महिलांनाही *लिंगदीक्षा अधिकार* दिला.
जगातील पहिली समतेवर आधारित लोकशाही संसद जी अनुभवमंटप नावाने ओळखली जाते.ती सन 1132 ला स्थापन करण्यात आली होती.यात महिलांही सक्रिय होत्या.महिलांसाठी प्रतिनिधित्व तरतूद केलेली होती,असे म्हणता येईल. एकूण 700 पुरुष व 70 महिला होत्या. या अनुभवमंटप मधील सदस्य चर्चा,विश्लेषण करून बहुमताने निर्णय,नियम बनवत. सलग 27 वर्ष या संसदेचे कार्य चालू होते. या अनुभवमंटपचे प्रमुख अतिशूद्र जातीतील अल्लमप्रभु होते. त्यांना शून्यसिंहसनाधिश्वर अशी पदवी दिली तरी योग्य होईल.प्रख्यात कानडी लेखक रमजान दर्गा उल्लेख करतात की, *शून्यसिंहसनाधिश्वरापुढे राजसिंहासन आणि मनुधर्म सिंहासन निस्तेज होऊ लागले.*
महात्मा बसवेश्वरांनी लिगायत धर्माचे चार तत्वे सांगितले आहेत.
1) ईस्टलिंगाद्वारे वैयक्तिक स्वातंत्र्य.
2) जंगमलिंगाद्वारे लोकप्रज्ञा
3) कायकद्वारे स्वावलंबन (शारीरिक श्रम)
4) दासोहद्वारे सामाजिक जबाबदारी
अंतरंगातील निराकार लिंग हे इष्टलिंगाचे प्रतीक होय. इष्टलिंगाची जाणीव म्हणजे देव होय.अनुभवमंटप व बसवेश्वरांनी वचनसाहित्य निर्माण केले आहे.
यातील एक सप्तशील Promise आहे.
“नको करू चोरी,नको करू हत्या,बोलूच नको मिथ्या
नका हो नका रागावू,
अन्याबद्दल अनादर नका बाळगू;
आपली स्तुती नका करू,
कोणाचीही निंदा नका करू,
हीच हो अंतरंग शुद्धी,
हीच हो बहिरंग शुद्धी।
हीच आमच्या कुडलसंगमदेवास आळविण्याची रीती”।।
(वचन 235)
महात्मा बसवेश्वरांनी *पुनर्जन्म* ही संकल्पना नाकारली आहे. त्यामुळे आहे त्या जन्मात सत्कर्म करीत रहावे.
प्रसिद्ध वचनात महात्मा बसवेश्वर म्हणतात,
“मी कोणाचा मी कोणाचा असे न म्हणवी देवा। हा आमचा,
हा आमचा,हा आमचा।
म्हणवी कुडलसंगमदेवा।।’
या वचनात ते समतेचा उदघोष करतात.
बसवधर्म केवळ पुजा करीत बसण्याचा धर्म नाही.आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित करणारा धर्म होय.
महात्मा बसवेश्वर यांनी चारही वेद,सर्वशास्त्रे,अठराही पुराणे नाकारली आहेत,त्यांचे खंडन केले आहे,ते थोतांड आहेत ते फेकून द्यावीत,त्यावर मी शस्त्र चालवून नष्ट करतो,असे म्हटले आहे. त्याबाबत वचनात म्हणतात,
“वेदांना चिंधोटीत गुंडाळून अडगळीत टाकीन।
शास्त्रांच्या पायांना बेड्या घालीन।
तर्काच्या पाठीवर आसुडाने फटके ओढीनं।आगमांचे नाक कापेन पहा हो।
महादानी कुडलसंगमदेवा,
मातंग चन्नयांच्या घरचा पुत्र मी आहे हो!”
महात्मा बसवेश्वर यांच्या जाती,धर्म,वर्ण, लिंग भेद विरहित, कर्मकांड विरहित लिंगायत धर्माचे अनेक अनुयायी निर्माण झाले.समता,मानवता, बंधुता,स्वातंत्र्य व न्याय यावर आधारित हा धर्म निश्चितच तथागताच्या पावलावर टाकलेले स्वतंत्र पाऊल होते! कर्नाटक,महाराष्ट्र,तेलंगाणा, आंध्रप्रदेश या राज्यातील अनेक विद्वानांनी,राजे यांनीही या लिंगायत धर्माचा स्वीकार केला.अनेक जातीच्या लोकांनी या धर्माला अंगीकृत केलेले आहे. सन 1167 ला कुडलसंगम येथे महात्मा बसवेश्वर यांचे निर्वाण झाले आहे. याबाबत वाढते प्रस्थ सहन न झाल्याने प्रस्थापित व्यवस्था ही भेद नीतीचा वापर करते, त्याप्रमाणे त्यांनाही संपवले असू शकते,असे अनेक अभ्यासक यांचे मत आहे. बसवबागेवाडी,कुडलसंगमदेव व बसवकल्याण याठिकाणी सापडलेल्या वस्तू, शिल्प यातून बसवेश्वरांच्या क्रांतिकारक स्मृती दिसून येतात. बसवकल्याण येथे असणारी 108 फूट उंचीचा बसवेश्वरांचा पुतळा असेल किंवा कर्नाटक राज्यात असणारे महात्मा बसवेश्वर याचे अनेक चौकात असणारे स्मारकं हे प्रेरणादायी आहेत.
आज मात्र स्वतंत्र अशा महात्मा बसवेश्वर निर्मित लिंगायत धर्मात इतर धर्माप्रमाणे जातीयता घुसखोरी करून लिंगायत धर्माला प्रदूषित करीत आहे. स्वतः ला लिंगायत म्हणून घेणारे बंधू बहिणी बसवेश्वरांनी सांगितलेल्या वचनांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात मूर्तिपूजा,कर्मकांड करीत आहेत. 33 कोटीच्या नादी लागलेले दिसून येत आहेत! विषमतेचे समर्थन व अनुकरण करतांना दिसत आहे. महात्मा बसवेश्वरांच्या कृती विचारांचे अनुयायी न होता भक्त होत आहेत. काही अंधभक्त महात्मा बसवेश्वरांचा विचारांच्या विरोधात कृती करतांना दिसत आहेत! तरी भक्त न होता अनुयायी होवून महात्मा बसवेश्वरांचा समतेचा विचार अंगीकृत करून प्रचार प्रसार करावा.त्यासाठी तो विचार हा वचनसाहित्य वाचून समजून घेवूया! कारण हाच विचार पुढे संत नामदेव,संत रविदास, संत कबीर,संत तुकाराम महाराजांनी पुढे नेला आहे. वारकरी संतांना तो मार्गदर्शक ठरला आहे. सन 1871 ते 1931पर्यंतच्या जनगणनेत लिंगायत धर्माची स्वतंत्र अस्तित्व/कॉलम होता. ही बाब आजच्या लिंगायत बंधु बहिणीसह,धर्मअभ्यासक,नेते,कार्यकर्ते यांनी समजून घ्यावी असे वाटते. मात्र स्वतंत्र भारतात ही ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच तर 1951 पासून आजपर्यंतच्या जनगणनेत स्वतंत्र ओळख होऊ दिली जात नाही. थोर साहित्यिक कलबुर्गी, लेखिका व पत्रकार गौरी लंकेश यांचे बलिदान बांधवांनो विसरून चालणार नाही.
यासाठी बसवेश्वरांनी लिहिलेले वचनसाहित्य स्वतः उघड्या डोळ्यांनी व शाबूत मेंदूनी वाचणे,त्याचे आकलन करून त्यानुसार वर्तन करणे गरजेचे आहे! ..कारण काही लिंगायत धर्मपीठ/ लिंगायत धर्मगुरू यांच्या कडून हे अपेक्षित होते. त्यांना विषमतावादी/सनातनी व्यवस्थेने आज अंकित केले आहे.ते बसवेश्वरांच्या विचारधारे विरुद्ध वर्तन करतांना दिसत आहेत! संघटीत समंजसपणे योग्य नेतृत्व यांच्या सोबत कार्य करावे लागणार आहे.तरी सर्व पोटभेद विसरून स्वतंत्रपणे अस्तित्व असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या लिंगायत धर्माला पुढे नेण्यासाठी प्रयत्नरत राहूया!
✒️लेखन:-रामेश्वर तिरमुखे(मो:-9420705753)



