पतीवरील प्रेमाचे प्रतीक : वट पौर्णिमा

32

✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-9923620919

          वट पौर्णिमा ज्याला वट सावित्री व्रत देखील म्हणतात. हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे. तात्विक दृष्टिकोनातून, वटवृक्ष दीर्घायुष्य आणि अमरत्वाचे प्रतीक म्हणून देखील स्वीकारले जाते. वटवृक्ष हे ज्ञान आणि निर्वाणाचेही प्रतीक आहे. भगवान बुद्धांना याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले. म्हणूनच पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करणे हा या व्रताचा भाग झाला. कथा कर्माबरोबरच स्त्रिया उपवास करतात आणि पूजा करतात आणि परिक्रमेदरम्यान वटवृक्षाभोवती सुताचे धागे गुंडाळतात. एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक झाडाभोवती एक औपचारिक धागा बांधून दर्शवते. या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे. वट सावित्री व्रत शुभ आणि संतान प्राप्तीसाठी मदत करणारे मानले जाते. भारतीय संस्कृतीत हे व्रत आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक बनले आहे. या व्रताच्या तिथीबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. स्कंद पुराण आणि भविष्योत्तर पुराणानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याचा नियम आहे, तर निर्णयामृत वगैरेनुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला उपवास करण्याचे सांगितले आहे.

          ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रम्हदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा, नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी, तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत, मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे. सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले. योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे ‘सावित्री’ नावाचे महाकाव्य लिहिले आहे.

          वटवृक्षाचे पूजन आणि सावित्री-सत्यवान कथेचे स्मरण करण्याच्या विधीमुळे हे व्रत वट सावित्री म्हणून प्रसिद्ध झाले. भारतीय संस्कृतीत सावित्रीला ऐतिहासिक पात्र मानले जाते. सावित्री म्हणजे वेदमाता गायत्री आणि सरस्वती. सावित्रीचा जन्मही विशेष परिस्थितीत झाला. भद्रा देशाचा राजा अश्वपती यांना मूलबाळ नव्हते असे म्हणतात. त्यांनी संततीप्राप्तीसाठी मंत्रोच्चारांसह दररोज एक लाख अर्पण केले. हा क्रम अठरा वर्षे चालू राहिला. यानंतर सावित्री देवी प्रकट झाली आणि वरदान दिले की, ‘राजन, तुझ्या पोटी एक तेजस्वी मुलगी होईल’. सावित्रीदेवीच्या कृपेने जन्माला आल्याने मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

         सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता-तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया ‘मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.

सन् आहे सौभाग्याचा, बंध आहे अतूट नात्याचा ।

या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा ।।

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!