शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती तात्काळ करा

43

▪️शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने परीपत्रकाची होळी करीत केला निषेध; जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.17जून):- शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी २८ मे २०२५ रोजी शिक्षकेत्तर पदभरतीसंदर्भात काढलेले पत्रक रद्द करणेबाबत व राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत आज (दि. १७) पत्रकाची होळी करीत संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या रिक्त पदांवरील पदभरतीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दि. ०४ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अनके वर्षानंतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांची पदभरती सुरू करण्यात आली होती. परंतू शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दिनांक २८ मे २०२५ च्या पदभरतीबाबतच्या पत्रकानुसार पदभरती सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार न करता सन २०२४-२५ च्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर रिक्त अतिरीक्त पदांचा आढावा घेऊन समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यांनतर निर्णय घेण्याचे ठरविले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ हे संपलेले असून देखील शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संचमान्यता देण्यास अजूनही दिरंगाई होत आहे. हे आश्चर्यकारक आहे व त्यामुळे पदभरती थांबवल्याने शालेय कामकाजाच्या व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षण संचालक माध्य. व उच्च माध्य. यांनी २८ मे २०२५ चे काढलेले पत्रक ताबडतोब रद्द करण्यात यावे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे खालील प्रलंबीत प्रश्न सोडवण्यात यावे यासाठी चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक १७ जून २०२५ रोजी दुपारी २.३० पाजता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सदर पत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. सदर पत्रक रद्द करून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास पुढील टप्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांच्या महामंडळाने घेतला आहे.

 

यावेळी शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न शिक्षण संचालक माध्य, व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. २८ मे २०२५ रोजी शिक्षकेत्तर पदभरतीबाबत काढलेले पत्रक त्वरित रद्द करून पदभरती सुरू करण्यात यावी, माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना २४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचा-याप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा, माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे नविन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा १०, २०, ३० वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा, माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पवित्र प्रणालीतून वगळून विना अट शिक्षक पदावर वेतनश्रेणीत पदोन्नती देण्यात यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे कंत्राटी पद्धतीने न भरता ती पूर्वीप्रमाणे शासन नियुक्त मान्यता प्राप्त असावी. या मागण्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, खाजगी शाळा व्यवस्थापन संघटनेचे सचिव सूर्यकांत खनके, कार्याध्यक्ष गणेश गेडाम सचिव प्रशांत हजारे सहसचिव सुभाष गेडाम कोषाध्यक्ष अनंता चौधरी, उपाध्यक्ष श्रीकृष्ण गोरे, चिमूरचे तालुकाध्यक्ष श्रीकांत चापले, चंद्रपूरचे भास्कर बोरसे, कोरपणाचे सुनील झाडे, वरोराचे वामन पुनवटकर, जिवतीचे शंकर पिदुरकर, सिंदेवाही संजय ज्ञानाबोगणवार, गजानन येवले, रोहिणी जोशी यांच्यासह शेकडो शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते