

पुणे, (११ ऑगस्ट) – महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांत यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी भवन, कोथरूड येथे “थिएटर ऑफ रेलेवन्स : कला-सत्वाच्या सत्यपथावरील ३३ वर्षांची रंगयात्रा” या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या विशेष सत्रात रंगचिंतक व थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे सृजक मंजुल भारद्वाज यांनी पुणेकरांशी थेट संवाद साधत नाटक, कला आणि समाजातील बांधिलकी या विषयावर सखोल विचार मांडले.
नाटकातून सत्याची जाणीव कशी पेरली याबाबत व्यक्त होताना, मंजुल भारद्वाज म्हणाले, “महात्मा गांधींनी सत्य बोलण्याचा आणि जगण्याचा निर्धार केला, तो एका नाटकामुळे. नाटकात सत्य मांडण्याची ताकद असते, पण नाटक करणाऱ्या कलाकारांना त्या सत्याच्या ताकदीची जाणीव आहे का?” या विचारप्रवर्तक प्रश्नातून रंगसंवादाची सुरुवात झाली. हा संवाद आत्मशोधाच्या दिशेने नेणारा ठरला आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या रंगचेतनेला स्पर्श करत वैचारिक मंथन सुरू झाले.
कलात्मक उन्मुक्ततेचा अनुभव आणि सत्यासोबत जगण्याची जाणीव ही प्रत्येक उपस्थिताला स्पंदित करत होती. “मी कोण? माझं भू-मी का?” या प्रश्नांवर आत्मचिंतन करण्याची गरज अधोरेखित झाली. “नाटक हे मुळात चेतना जागवणारं दर्शन आहे. पण सत्ताधाऱ्यांनी त्याला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत सीमित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नाटक म्हणजे फक्त मनोरंजन’ हा सामंतवादी विचार आहे. खरी कला माणसाला माणूस होण्याचा बोध देते.”त्यांनी हेही स्पष्ट केले की, राजकीय व सामाजिक सत्तांनी कलाकार पाठिंब्याशिवाय टिकू शकत नाही, ही चुकीची धारणा पसरवली. मात्र, थिएटर ऑफ रेलेवन्सने गेली ३४ वर्षे कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी निधीशिवाय, केवळ प्रेक्षकांच्या सहयोगाने जागतिक स्तरावर रंगकर्म सादर केले आहे.
——-
“तर्काच्या पुढे विवेक आहे, आणि कला ही सत्य, समग्रता व सौंदर्याची पुरस्कर्ती आहे.”-मंजुल भारद्वाज
रंगकर्मी अश्विनी नांदेडकर यांनी नाट्यसिद्धांताच्या कलात्मक प्रक्रियेबद्दल बोलताना नमूद केले “व्यक्तीपेक्षा प्रक्रिया मोठी असते. व्यक्ती येते-जाते, पण प्रक्रिया अखंड राहते. कलाकाराने स्वतःच्या भूमिकेची जाणीव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.आज असत्याचा बोलबाला आहे, असत्य फोफावत चालले आहे कारण सत्य समजण्याची, स्वीकारण्याची, मांडण्याची आणि हुंकार देण्याची ताकद कमी पडत आहे. त्या ताकदीला नव्या ऊर्जेने सृजित करूया”
या परिसंवादाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गांधीवादी अन्वर राजन होते. कार्यक्रमाचा समारोप रंगसंवाद आणि सामूहिक प्रणाने झाला, ज्यात सत्य, कला आणि चेतनेच्या या प्रवासाला नव्या ऊर्जेने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त झाला.



