काही अब्जाधीशांना ठरवून मोठे करणे हीच राज्यांची विकासनीती आहे का?-मेधा पाटकर यांचा सवाल प्रतिपादन

73

 

पुणे -(प्रतिनिधी) : राज्यांची विकासनीती ही संविधानातील तत्वांच्या आधारे ठरत नाही. काही अब्जाधीशांना ठरवून मोठे केले जात आहेत. आर्थिक असमानता नष्ट करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.

समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त पुण्यात तीन दिवसीय समाजवादी संमेलन सुरू आहे. दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात अध्यक्षस्थानी पाटकर होत्या. ‘विकासाच्या संकल्पनेपुढील आव्हाने आणि समाजवादी पर्याय’ या विषयावर सत्र झाले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अर्थतज्ज्ञ हितेश पोतदार, पर्यावरणतज्ञ सौम्य दत्त, किसान संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष अँड. आराधना भार्गव यांनी मांडणी केली. लोकशक्ती अभियानचे संयोजक प्रफुल्ल सामंतरा यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले. ‘ सामाजिक न्याय : जन आंदोलन आणि व्यवस्था परिवर्तन’ या विषयावर दुसरे झाले. या सत्रात मधू मोहिते, निरंजन टकले, सुशीला मोराळे, रत्ना व्होरा सहभागी होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील होते.

आजच्या काळात विकास हा मंत्र झाला आहे. मात्र आर्थिक असमानता यालाच विकास म्हटले जात आहे. मणिपूरमधील हिंसाचार हा केवळ दोन समाजातील नसून त्याच्या मुळाशी विकास आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस केली जात आहे, असेही पाटकर म्हणाल्या.

देशात गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत आहेत. गरिबी श्रीमंती हा मोठा भेद आहे. मात्र देशाचे पंतप्रधान हे बेशरमसारखे म्हणतात की, श्रीमंत होणे हे पाप नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्य आणि देशातील अनेक जागा ह्या अदानी, अंबानी यांच्या घशात घातल्या जात आहेत. समृद्धी महामार्ग उभारणीत 20 हजार कोटी रुपयांचा झालेला भ्रष्टाचार महाराष्ट्रातील पक्ष फोडण्यात आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी वापरला आहे, अशीही टीका सपकाळ यांनी केली. काँग्रेस आणि समाजवादी चळवळ यांचे पूर्वपरंपार संबंध आहेत. मात्र समाजवादी आणि काँग्रेसचे संबंध हे ‘तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’ असे राहिले आहेत, असाही मिश्किल टोला सपकाळ यांनी लगावला.

देश संकटात आला तेव्हा समाजवादी चळवळीने देशाला सावरले आहे. समाजवादी चळवळ मजबूत असती तर मोदी इतके वर्षे सलग सत्तेत राहिले नसते. सरकार पाडण्यात समाजवादी माहीर आहे, असे मत सुशीला मोराळे यांनी व्यक्त केले.

निरंजन टकले म्हणाले की, शाळेच्या अभ्यासक्रमातून खोटा आणि विखारी इतिहास शिकवला जातो. त्याविरोधात प्रतिकार करायला हवा. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पळून जातील. विजयादशमी दिनी संघाला शंभर वर्षे होत आहेत. त्या दिवशी संघाचा रावण जाळला पाहिजे.

 

—-
*चौकट : समाजवादी ब्राह्मणांनी संघाविरोधात भूमिका घ्यावी*

 

 

बी. जी. कोळसे पाटील म्हनाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे भित्रे आहेत. सरकार कुणाचेही असो मात्र सत्ता आमच्याच हातात असली पाहिजे ही संघाची रणनीती आहे. समाजवाद्यांमधील ब्राह्मणांनी संघाच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी.