Home चंद्रपूर विजयस्तंभाला अभिवादन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन: मालेवाडा येथे शौर्य दिन...

विजयस्तंभाला अभिवादन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन: मालेवाडा येथे शौर्य दिन व बालिका दिन उत्साहात साजरा

119

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.5जानेवारी):-तालुक्यातील मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात दि.१ जानेवारी ला भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव प्रतिकृती विजय स्तंभाला उपासक उपसिका यांनी मानवंदना दिली. भीमा कोरेगावच्या इतिहासाबाबत बौद्ध पंच कमिटीचे माजी सचिव आशिक रामटेके व करिष्मा वाघमारे यांनी भाषणातून मार्गदर्शन केले. दि. 2 जानेवारीला रात्री 8.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने उपासक उपसिका व गावकरी यांची मने जिंकली. तर दि. 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने दुपारी बारा वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले. क्रांतिज्योती मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने प्रस्थान करत जि.प.शाळा, ग्रा.प, छत्रपती शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मार्गातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करीत बुद्ध विहारात तिची सांगता झाली.

कार्यक्रमाची सुरुवात तथागतांच्या मूर्तीला, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे आदरणीय भंते सुगतानंदजी महाथेरो यांनी उपस्थितांना शील देऊन सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. नंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षा आयु.सुरक्षा अंबादे, आयु. हरी मेश्राम सर , आयु. ताई मेश्राम मॅडम,आयु. समतादूत प्रज्ञा राजूरवाडे मॅडम ,आणि व इतर मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यात सहभागी असलेले आयु. रणजीत बोरकर यांचा बौध्द पंच कमेटी ने शाल, पुस्तक व पुष्पगुछ भेट देऊन सन्मान केला.

याप्रसंगी उपासिका उज्ज्वला गजभिये यांच सुद्धा त्यांच्या समर्पित धम्म कार्याबद्दल शाल, पुस्तक व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी ना पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं संचालन विद्या रामटेके, मीनाक्षी गजभिये यांनी केले. व आभार प्रदर्शन करिष्मा गजभिये यांनी मानले. नववर्षाच्या सुरुवातीला झालेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमातून शौर्य,आत्मसन्मान, शिक्षण,स्त्री-पुरुष समानता, कलागुण आणि सामाजिक उत्तरदायित्व या मानवी मूल्यांच्या संदेशासह नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व सामाजिक सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

                बौध्द पंच कमेटी,भीमज्योती महिला मंडळ,ग्राम पंचायत पदाधिकारी,शाळेचे शिक्षक – विद्यार्थी,उपासक – उपासिका, गावकरी बांधवांच्या सहकार्यातून आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.