

(8 जानेवारी: मधु लिमये पुण्यस्मरण)
आपल्या महाराष्ट्रात असे अनेक नेते होऊन गेले. ज्यांची किंमत आपल्या माणसांना कळली नाही. मात्र, देशभतारील विविध राज्यात त्यांना मोलाचे स्थान होते. समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाचा महासागर असलेले नेते मधु लिमये यांच्याबाबतीतही हेच घडले. मधु लिमये यांची आज पुण्यतिथी आहे. त्याबद्दल त्यांच्या जीवनाविषयी श्री एन. कृष्णकुमार जी. गुरूजींच्या या संकलित लेखातून जाणून घेऊयात….
मधुजी लिमये यांचा जन्म पुणे येथे दि.०१ मे १९२२ रोजी झाला. त्यांचे वडिल शिक्षक होते. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधुजी लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले. सन १९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तरूण वयातच त्यांचा परिचय एस.एम.जोशी, शिरूभाऊ लिमये, नानासाहेब गोरे व पां.वा.गाडगीळ यांच्याशी झाला. त्यांच्या प्रभावाने त्यांना राजकारण, समाजकारण यात रस वाटू लागला. एस.एम.जोशी यांच्या प्रोत्साहनाने वयाच्या १८व्या वर्षीच ते स्वातंत्र्य चळवळीत शिक्षण सोडून सामील झाले. सन १९४२च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना चार वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला होता. सन १९४८ साली त्यांची काँग्रेस सोशालिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली. सन १९४९ साली समाजवादी पक्षाचे संयुक्त चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झाली.
मधुजींच्या जीवनात एक अशी घटना घडली होती. जी इतर कोणाच्या आयुष्यात क्वचितच घडली असेल किंवा येथून पुढे घडेल. मधू लिमये हे अस्सल मराठी माणूस होते. त्यामूळे ते निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यावर साहजिकच निवडूण येणार हे ठरलेले असे. ते एकदा नव्हे तर चारवेळा निवडून आले आणि एकदाच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मधू लिमये हे मूळचे पुण्याचे, मात्र चारवेळा खासदार झाले तेही बिहारमधून. राज्यसभेवर इतर राज्यातून गेलेले बरेच नेते सापडतील. मात्र इतर राज्यातून लोकांमधून निवडून लोकसभेत गेलेल्या नेत्यांची नावे फार नाहीत. मधू लिमये अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. सन १९६४मध्ये सोशालिस्ट पार्टी आणि प्रजा सोशालिस्ट पार्टी हे दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन झाले होते. त्यांनी एकत्र संयुक्त सोशालिस्ट पार्टी निर्माण केली. याच संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे तिकिटावर मधू लिमये यांना मिळाले. बिहारमधील मुंगेर लोकसभा हा लिमयेंचा मतदारसंघ. येथे १९६४- ६७मध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्या पोटनिवडणूकीत ते पहिल्यांदा लोकसभेवर गेले. या विजयानंतर ते संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्षही झाले. बिहारमधीलच बांका मतदारसंघातून सन १९७३मध्ये ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयीही झाले. मात्र, ही सुद्धा पोटनिवडणूक होती. दरम्यानच्या काळात आणीबाणी जाहीर झाली. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वात इंदिरा गांधींविरोधातील बहुतांश पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता दल स्थापन केला. जयप्रकाश नारायण हे त्याचे प्रमुख होते. सन १९७७मध्ये ते जनता पार्टीकडून बांका लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. मधुजी लिमये महाराष्ट्रातूनही निवडणूक लढले होते. संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी म्हणजे सन १९५७मध्ये मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र, तिथे ते पराभूत झाले होते. मुंबईत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या लिमयेंना बिहारमध्ये मात्र यश मिळाले.
गोवामुक्ती संग्रामासाठी त्यांनी आंदोलने केल्याने आणि लोकांना एकत्र केल्याने त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण होते. मात्र, निवडणुकीत त्याचा काही फायदा झाला नाही. सन १९७१च्या निवडणुकीत मुंगेर तर सन १९८०च्या निवडणुकीत बांकामधून पराभूत झाले. सलग दोनवेळा पराभव पदरी पडल्याने त्यानंतर त्यांचा राजकीय वावरही कमी होत गेला. पुढे सन १९८२ साली तर ते राजकारणातून बाहेरच पडले. ब्रिटीश आणि पोर्तुगीजांशी लढून तुरुंगात गेलेले स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय सवयंसेवक संघाच्या नेत्यांच्या दुहेरी सदस्यत्वाला आक्षेप घेऊन मोरारजी देसाई यांचे सरकार एकहाती पाडणारे नेते अशी मधू लिमये यांची ओळख आपल्याला माहीत आहेच. मात्र या सर्वात त्यांची एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून देखील एक वेगळी ओळख होती. पक्षांतरबंदीच्या कायद्याला विरोध करताना त्यांनी जे मुद्दे मांडले होते त्यावरून आपल्याला त्यांच्या संसदीय राजकारणातील अनुभवाची एक झलक येते. जनमत आणि इतर राजकारणी पक्षांतरबंदीच्या बाजूने असताना मधू लिमये मात्र या विरोधात बोलत होते. त्यावेळी मधू लिमये संसदेचे सदस्य नव्हते, मात्र त्यांनी त्याविरोधात आपल्या लेखांमधून आवाज उठवला होता.
मधुजी लिमये यांनी विपुल लेखन केलेले आहे. त्रिमंत्री योजना, कम्युनिस्ट जाहीरनाम्याची १०० वर्षे, स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा, पक्षांतर बंदी? नव्हे, अनियंत्रित नेतेशाहीची नांदी इत्यादी. त्यांची मराठी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिदीत व इंग्रजीतही पुष्कळ लेखन केलेले आहे. राजनिती का नया मोड, मार्क्सवाद और गांधीवाद, संक्रमणकालीन राजनिती इत्यादी. तर प्राईम मुव्हर्स: रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल इन हिस्टरी हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे. अशा या धडाडी नेत्याचे दि.०८ जानेवारी १९९५ रोजी निधन झाले.
!! मधुजी लिमये यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!
✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे गुरूजी[संत व थोर पुरुषांच्या चरित्रांचे गाढे अभ्यासक]रामनगर वॉर्ड, गडचिरोली.9423714883







