

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.4फेब्रुवारी):- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, केबीसीएनएमयू सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेसन अँड लिंकेजस (KCIIL) आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘एकदिवसीय नव तंत्रज्ञान कौशल्य अभियान’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते, तर उदघाटक म्हणून विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील, प्रमुख मार्गदर्शक म्हणून केसीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे, कार्यक्रम समन्वयक रोशनी जैन व इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निखिल जाधव हे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. कर्दपवार इत्यादी मान्यवर विचारमांचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी कार्यशाळेचे उद्देश व महत्त्व सांगून आलेल्या पाहुण्याचा परिचय करून दिला.
याप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना डॉ. संजय पाटील यांनी आजच्या काळात नव तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून कौशल्य आत्मसात करून स्वतः च्या जीवनात उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्र. प्राचार्य प्रा. के. एन. सोनवणे यांनी नव तंत्रज्ञान कौशल्य, उद्योजक वृत्ती बाळगून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध व्यवसायात भाग घेण्यासाठी स्वतः ला तयार ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. नवीन खंडारे यांनी विद्यार्थ्यांनी उद्योजकीय मानसिकता ठेवून नवीन कल्पनांच्या माध्यमातून कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगून, आयडिया ते स्टार्टअप, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करीअरच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात रोशनी जैन यांनी केसील मार्फत स्टार्टअपसाठी असलेल्या विविध अर्थ सहाय्य योजनांची माहिती दिली.
तर तिसऱ्या सत्रात उद्योजक निखिल जैन यांनी स्वतः स्टार्टअप सुरू करतांना आलेल्या अडचणी व त्या अडचणींवर मात करण्याचे मार्ग सांगून, त्यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप प्रवासाचे अनुभवकथन केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख सौ. एस. बी. पाटील यांनी केले.
या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी राज्यशास्त्र विभागातील व्ही. बी. पाटील, एस. जी. पाटील व व्ही. व्ही. खैरनार व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.







