Home महाराष्ट्र गुरुवारी शब्दगंधची महत्वपूर्ण बैठक : सतराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनावर चर्चा

गुरुवारी शब्दगंधची महत्वपूर्ण बैठक : सतराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनावर चर्चा

95

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.17मार्च):-शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या आयोजना संदर्भात महत्वपूर्ण बैठक गुरुवार, दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जाधव लॉन्स, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे व समाज माध्यम समन्वयक मकरंद घोडके यांनी दिली.

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या सर्व सभासद व कार्यकारी मंडळाची ही संयुक्त बैठक असून, या बैठकीत संमेलनाच्या आयोजनाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये संयोजन समितीची स्थापना, पोस्टर्स स्पर्धा, स्टॅन्डअप कॉमेडी शोचे आयोजन, राहाता तालुका कार्यकारी मंडळास मंजुरी, स्वागताध्यक्षांच्या नावाबाबत चर्चा, साहित्य संमेलनातील पुस्तक प्रकाशनासाठीचे नियम, तसेच काव्यसंमेलनासाठी आवश्यक अटी व नियम निश्चित करणे या मुद्द्यांचा समावेश आहे.

याशिवाय सन २०२५ मधील पुस्तकांच्या परीक्षण समितीने दिलेल्या निकालास मान्यता देणे, तसेच माजी संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा ग्रंथ प्रकाशित करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी तिलोक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पाथर्डी यांना पुस्तके भेट देण्यात येणार आहेत.

साहित्य संमेलन अधिक दर्जेदार आणि यशस्वी करण्यासाठी साहित्यिकांच्या कल्पना व संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने सर्व साहित्यिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, उपाध्यक्ष डॉ. जी. पी. ढाकणे, कार्यवाह भारत गाडेकर, खजिनदार भगवान राऊत तसेच शिरीष जाधव, राजेंद्र पवार, राजेंद्र फंड, प्रशांत सूर्यवंशी, स्वाती ठुबे, जयश्री झरेकर आणि शर्मिला गोसावी यांनी केले आहे.