Home चंद्रपूर 5 एप्रिल रोजी काँग्रेसचे वैनगंगा नदीपात्रात ठिया आंदोलन

5 एप्रिल रोजी काँग्रेसचे वैनगंगा नदीपात्रात ठिया आंदोलन

188

▪️गोसिखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासह इतर मागन्यांचा समावेश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.31मार्च):-गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हे शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी सारख्या मोठ्या नदी आहे, त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तर कधी गोसिखुर्द धरणातील विसर्ग किंवा मेडीगट्टा धरनातील बँक वाटर मुळे जिल्ह्यात वारंवार पुरस्थिती निर्माण होते व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी नुकसान होत असते, या त्रासाला कंटाळून व झालेल्या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी नदी काठावरील अनेक शेतकरी उन्हाळी पिक घेतात, मात्र गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकर्यांना आता शेती करायला अडचणीचा सामना करावा लागत आहे या सोबतच अनेक पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण येत आहे.

त्यामुळे नदी काटावरील गावातील भूजल पातळी कमी झाल्याने अनेक गावकर्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्मान होत आहे, सदर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ८ दिवसाच्या पूर्वी मा. मुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, मा. सह पालकमंत्री,  मा. जिल्हाधिकारी यांच्या कडे गोसीखुर्द धरणातील पाणी सोडण्याची  मागणी  पत्राच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली होती मात्र अजून पर्यंत मागणी पूर्ण न झाल्याने, गोसीखुर्द धरणातील  पाणी  तातडीने सोडण्यात यावे यासह जिल्ह्यातील इतर मागण्यांना घेऊन, दिनांक 5 एप्रिल 2025  रोजी,  दुपारी 1.00  वाजता, गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी व गावकर्यांना घेऊन, चंद्रपूर रोड वरील वैनगंगा नदी पात्रात , पुलीयाच्या खाली ठीय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती *गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,आमदार रामदासजी मसराम* यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

यावेळी पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष  महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम, महाराष्ट्र प्रदेशकाँग्रेस सचिव पंकज गुड्डेवार, शहर अध्यक्ष सतीश विधाते महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष  प्रशांत कोराम, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, काँग्रेस नेते देवाजी सोनटक्के,  दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, ढिवरू मेश्राम, प्रतीक बारसिंगे, निखिल खोब्रागडे, चारू पोहने, जावेद खान, रवी चापले, भाग्यवान मेश्राम,सुधीर बांबोळे, विजय लाड, उत्तम ठाकरे, कुणाल आभारे,रेशीम प्रधान, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आंदोलनातील इतर मागण्या::

◆ गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा.

◆ भेंडाळा त.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकर्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये.

◆कोटगल बँरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकर्यांना मिळाले नसून, योग्य तो मोबदला  त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अश्या शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.

◆मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.

◆वडसा – गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक  सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा.