

‘यज्ञीय’, ‘समाचारी’, ‘खंतुकीय’ आणि ‘मोक्षमार्गगती’ अशा २५ ते २८ अध्यायांवर सविस्तर चर्चा आजच्या धर्मप्रवचनात प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी श्रावक-श्राविकांना समजावून सांगितली.
‘समाचारी’ या अध्यायात घर-परिवार असो वा साधू-साध्वींच्या समूहात, वरिष्ठांना अथवा साधू-साध्वी किंवा घरातील कनिष्ठ सदस्य काय करतात याची कल्पना असायला हवी. आपण करत असलेल्या कृतीची अनुमती घेतलीच पाहिजे. अशा दहा प्रकारच्या गोष्टी विचारल्या पाहिजेत.
हे स्पष्ट करण्यासाठी सासू व सुनेचे उदाहरण सांगण्यात आले. “चूक झाली असेल तर चूक मान्य करा.” काही नवीन गोष्ट सतत स्वीकारावी व शिकावी. “ज्येष्ठांचा आदर, सन्मान करावा” — हे दहा समाचारी जसे साधूजीवनात आवश्यक आहेत तसेच व्यक्तीगत जीवनातही आवश्यक आहेत.
‘खंतुकीय’ या २७ व्या अध्यायात दुष्ट बैलाचे उदाहरण दिले आहे. त्याचे चार प्रकार सांगण्यात आले. त्याचप्रमाणे चार स्वभावाचे शिष्य असतात. ‘अनुशासन’ व ‘विनय’ या दोन्ही गोष्टींचे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगण्यात आले.
गर्भाचार्य या गुरूंचे पाचशे शिष्य असतात. ते सर्वच अविनयी, वाईट वर्तन करणारे असतात. आचार्यांनी त्यांना खूप समजावले, शिकविले, पण ते सुधारले नाहीत. अशा शिष्यांत राहून गर्भाचार्य स्वतःची साधना सुरक्षित ठेवण्यासाठी त्या शिष्यांना सोडून निघून जातात.
‘मोक्षमार्गगती’ या २८ व्या अध्यायात सविस्तर सांगितले आहे की, १ ते १४ ‘ज्ञान’, १५ ते ३१ ‘दर्शन’, आणि नंतरच्या गाथांमध्ये ‘चारित्र’ व ‘तप’ यांचे महत्त्व सांगितले आहे.
‘दर्शन’ शिवाय ‘ज्ञान’ नाही. ज्ञानाला चारित्र्याची जोड मिळावी. संचित कर्मक्षय करण्यासाठी ‘चारित्र’ आणि ‘तप’ या चार गोष्टींमुळे मोक्षमार्ग प्रशस्त होतो, असे मोलाचे विचार आजच्या प्रवचनात प्रस्तुत करण्यात आले.(ऑक्टोबर १७ः २०२५ स्वाध्याय भवन, जळगाव)
✒️शब्दांकन किशोर कुलकर्णी(मो:-9422776759)







