

✒️अतुल उनवणे(जालना, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081
जालना(दि.16जुलै):-इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योती या संस्थेची स्थापना केली. परंतु अजूनही ही योजना कार्यान्वित करण्यात आलेले नाही. यामुळे सदरील प्रवर्गातील बांधवांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. बार्टी,सारथीच्या धर्तीवर महाज्योती योजनेतून सदरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासह वसतिगृहाची सोय व्हावी जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून सदरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी योग्य दिशा मिळेल व मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योती ही योजना तात्काळ कार्यान्वित करून भरगोस निधी या योजनेसाठी वर्ग करावा. अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष श्री.नवनाथआबा वाघमारे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नवनाथआबा वाघमारे यांनी म्हटले आहे की, ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते ना. छगनरावजी भुजबळ साहेब, मा. खा. समीरभाऊ भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून महा ज्योती या योजनेला गती देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद काम करणार आहे. महाराष्ट्र शासनाने महा ज्योती योजनेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन करेल असा इशाराही नवनाथ आबा वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिला आहे.व लवकरच ओबीसींचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना महा ज्योतीच्या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या इतर मागण्या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे यांनी म्हटले आहे.





